व्यावसायिक, वाहनधारक, रहिवाशांचे हाल : गटारीचे बांधकाम करून रस्ता त्वरित खुला करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
महाद्वार रोड क्रॉस ते नाल्यापर्यंतच्या सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी गटारीचे बांधकाम करण्यात येत आहे. हे काम सुरू करून दीड महिना उलटला. पण काम अद्यापही अर्धवट स्थितीत आहे. सदर काम संथगतीने सुरू असल्याने व्यावसायिक आणि वाहनधारकांना त्रासदायक ठरले आहे. गटारीचे बांधकाम पूर्ण करण्यास आणखी किती महिन्यांचा कालावधी लागणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
भांदुर गल्लीतून येणारे सांडपाणी कपिलेश्वर उड्डाणपुलाजवळून गटारीद्वारे सोडण्यात येते. मात्र पावसाळ्यात गटार ओव्हरफ्लो होवून सांडपाणी कपिलेश्वर तलावामध्ये मिसळत आहे. ऐन गणेशोत्सवात विसर्जनावेळी पावसाचे पाणी ओव्हरफ्लो होवून कपिलेश्वर तलावात शिरल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. येथील समस्यांचे निवारण करण्यासाठी महाद्वार क्रॉसपासून गटारीचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. सदर सांडपाणी नाल्यामध्ये सोडण्यात येणार आहे. गटारीला स्लोप मिळत नसल्याने येथील उड्डाणपुलाशेजारील पाईप काढून नवीन गटार बांधण्यात येत आहे. सध्या मेट्रो हॉटेलपर्यंत गटारीचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र पुढील बांधकाम रखडले असून व्यावसायिकांना डोकेदुखीचे ठरत आहे.
यापूर्वी ड्रेनेजवाहिन्या घालताना ड्रेनेज
ब्लॉक झाल्याने समस्या निर्माण झाली होती. जवळपास सहा महिने झाले तरी या समस्येचे निवारण झाले नाही. अशातच येथील गटारीचे बांधकाम अर्धवट ठेवण्यात आले आहे. हे काम अत्यंत संथगतीने सुरू असून बांधकाम साहित्य इतरत्र पसरले आहे. गटारीचे बांधकाम करण्यासाठी खडी, वाळू, चिपिंग आदी साहित्य रस्त्यावरच टाकण्यात आले आहे. खडी पसरली असल्याने वाहने घसरून नागरिक पडत आहेत. तसेच याठिकाणी तीन रस्ते मिळत असल्याने वाहतुकीस अडचण निर्माण होत आहे. या परिसरात रुग्णालये, हॉटेल तसेच विविध व्यवसाय आहेत.
गटारीचे बांधकाम अर्धवट असल्याने येथील व्यावसायिकांना तसेच रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. व्यावसायिकांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. गटार बांधण्यासाठी मोठी चर खोदण्यात आल्याने ये-जा करताना अडचण होत आहे. काही ठिकाणी प्लायवूड घालून साकव बनविण्यात आले आहे. पण वृद्ध आणि लहान मुलांना हे धोकादायक बनले आहे. कित्येक महिन्यांपासून येथील समस्या जैसे थै असल्याने गटारीचे बांधकाम कधी पूर्ण होणार? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. गटारीचे काम पूर्ण करून रस्ता खुला करावा, अशी मागणी होत आहे.