वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी कोरोनाबाधेतून अद्याप पूर्णपणे बरा झाला नसल्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱया टी-20 मालिकेत तो खेळू शकणार नाही तर विश्रांती देण्यात आलेल्या हार्दिक पंडय़ाच्या जागी बंगलाचा अष्टपैलू शाहबाज अहमदला स्थान देण्यात आले आहे.
अष्टपैलू दीपक हुडाही पाठदुखीमुळे या मालिकेतून बाहेर पडला असून राष्ट्रीय निवड समितीने मध्यफळीतील फलंदाज श्रेयस अय्यरला या मालिकेसाठी निवडले आहे. मागील मालिकेत शमीच्या जागी उमेश यादवला घेण्यात आले होते. त्याला संघात कायम ठेवण्यात आले असल्याचे बीसीसीआयमधील सूत्राने सांगितले. हार्दिकच्या जागी शाहबाजची निवड का करण्यात आली, असे विचारता, त्याच्या जागी खेळविता येईल असा सीम बॉलिंग ऑलराऊंडर दुसरा कोणी आहे का, असा त्यांनी प्रतिप्रश्न केला. राज बावा अजून अपरिपक्व आहे, म्हणून आम्ही त्याला भारत अ संघात अनुभवासाठी निवडले आहे. तो तयार होण्यासाठी त्याला आणखी वेळ द्यायला हवा, असे त्यांनी स्पष्ट केले. इराणी चषक स्पर्धेत शेष भारत संघाचे नेतृत्व हनुमा विहारी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सौराष्ट्रविरुद्ध ही लढत होणार आहे.