शाहुवाडी, प्रतिनिधी संतोष कुंभार
Shahuwadi Crime News : शाहुवाडीसह पन्हाळा परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. कृषी सेवा केंद्रातच चोरट्यांचे लक्ष केंद्रित झाले असून एक महिन्यात तीन कृषी सेवा केंद्रातून अज्ञात चोरट्यानी रोख रकमेसह माल लंपास केल्याची घटना घडल्याने कृषी सेवा केंद्र चालकांच्यात कमालीचे भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस प्रशासनाने तात्काळ याबाबत विशेष लक्ष घालून रात्रीच्या गस्त पथकात वाढ करावी अशी मागणी कृषी सेवा केंद्र चालकांच्यातून होऊ लागली आहे.
गेले महिना दोन महिन्यापासून अनेक ठिकाणी चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. पन्हाळा तालुक्यातील शहापूर येथील कृषिरत्न अॅग्रो एजन्सी या कृषी सेवा केंद्रात तीन वेळा चोरी झाली. तर बांबवडे येथील कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील पाटील कृषी सेवा केंद्र या ठिकाणी अज्ञातानी चोरी केली. ठमकेवाडी फाटा येथील मावलाई कृषी सेवा केंद्रामध्येही अज्ञात चोरट्यानी शटर उचकटून रोख रकमेसह माल लंपास केल्या ची घटना रविवारी मध्यरात्री घडली. तर त्याच रात्री शाहूवाडीतील देखील एका कृषी सेवा केंद्र समोर चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्याचे दिसत आहे.
पावसाळ्याच्या दिवसात सर्वत्र सन्नाटा पसरलेल्या अवस्थेत , त्याचबरोबर काही वेळा विद्युत पुरवठा खंडित झाल्याच्या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. गेले दोन महिन्यापासून शाहूवाडीसह परिसरात चोरट्यांच्या हालचाली चांगल्याच वाढल्या आहेत. अनेक ठिकाणी लहान मोठ्या चोऱ्या झाल्या आहेत. त्याबरोबरच दुचाकी गाड्यांची देखील अज्ञात चोरट्याने चोऱ्या केल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास बंद असलेल्या दुकानचे शटर उचकटून त्या दुकानात असलेली रोख रक्कम व मालावर देखील डल्ला मारला जात आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे कैद होत असले तरी, देखील त्यांची ओळख पटवणे पोलीस प्रशासनासमोर एक आव्हान उभे राहिले आहे.
एक वाचले दुसरे फोडले
रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास शाहूवाडी येथील एका कृषी सेवा केंद्र समोरील शटर उचकटण्याचा प्रयत्न करत असलेले चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्याचं दिसत आहे.सदर ठिकाणी चोरी करण्यात अपयश आलेल्या चोरट्यानी बांबवडे मलकापूर मार्गावरील ठमकेवाडी फाटा येथील माऊलाई कृषी सेवा केंद्र व संग्राम बियर शॉपी या बंद दुकानांचे शटर उचकटून रोख रक्कम व माल लंपास केल्याची घटना घडली.
कृषी सेवा केंद्र चालकांच्यात भीतीचे वातावरण
दरम्यान चोरट्यांच्या या वाढत्या धुमाकूळाने कृषी सेवा केंद्र चालकांच्यात देखील भितीचे वातावरण पसरले आहे. सर्वच ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध नसल्याने तसेच ग्रामीण भागात देखील असलेल्या कृषी सेवा केंद्र चालकांच्यात यामुळे चांगलीच भीती निर्माण झाली आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीने विशेष गांभीर्यपूर्वक या बाबीकडे लक्ष देत रात्रीच्या गस्त पथकात वाढ करावी अशी मागणी कृषी सेवा केंद्र चालकांच्यातून होऊ लागली आहे.