राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिवेशन दिल्लीत आयोजित
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आगामी लोकसभा निवडणुकीवरून भाजपविरोधात विखुरले गेलेल्या विरोधी पक्षांना एकजूट करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. बिहारमधून नितीश कुमार यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. तर राहुल गांधी हे भारत जोडो यात्रेत सामील झाले आहेत. याचदरम्यान दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतःचे 8 वे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित केले आहे. या अधिवेशनात विरोधी पक्षांच्या एकजुटतेवर चर्चा झाली आहे. सर्व मतभेद बाजूला ठेवून सर्व बिगरभाजप पक्षांना एकजूट आणण्याची क्षमता असणारे शरद पवार हे एकमात्र नेते असल्याचे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे महासचिव प्रफुल्ल पटेल यांनी काढले आहेत.
शरद पवार हे पंतप्रधानपदाचे उमेदवार नाहीत, तसेच ते याकरता इच्छुक नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रीय ओळख मिळाली असून आम्ही लोकसभा निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावू असे पटेल यांनी म्हटले आहे.
केसीआर, स्टॅलिन, ममता बॅनर्जी, सीताराम येच्युरी, चौताला आणि काँग्रेसचे नेते हे शरद पवारांकडे येत असतात. यामागे पवार यांचे व्हिजन आहे. पवार हेच सर्व पक्षांना एकत्र आणू शकतात असे पटेल यांनी म्हटले आहे. पटेल यांच्या या विधानाला केरळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पी.सी. चाको यांनी समर्थन दर्शविले आहे.
सर्व विरोधी पक्षांनी स्वतःचे गतवैभव गमाविले आहे. प्रमुख विरोधी पक्षाने चार वर्षांमध्ये उत्तरप्रदेशात एकही स्थानिक निवडणूक जिंकलेली नाही. अशा स्थितीत हा पक्ष देशाचे नेतृत्व कसे करणार असे उद्गार चाको यांनी काँग्रेसला उद्देशून काढले आहेत. चाको हे यापूर्वी काँग्रेस पक्षात होते हे विशेष.
राष्ट्रीय अधिवेशनापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी कार्यकारिणी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत पक्षाने विरोधकांच्या एकजुटीचे आवाहन केले होते. याच बैठकीत शरद पवार यांची पक्षाध्यक्ष म्हणून पुन्हा निवड करण्यात आली होती.
पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनाला शरद पवार यांनी रविवारी संबोधित केले आहे. पवारांनी पक्षाच्या नेत्यांना 4 मुद्दय़ांवर एकजूट होण्याची सूचना केली आहे. यात शेतकरी, सांप्रदायिक सौहार्द, महागाई, महिलांची सुरक्षा, बेरोजगारी आणि सीमासुरक्षा तसेच केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर हे मुद्दे सामील आहेत. पवारांनी बिल्कि बानो प्रकरणावरून भाजपवर टीका केली आहे. तर दुसरीकडे दिल्ली दौऱयावर आलेले नितीश कुमार यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. तत्पूर्वी के. चंद्रशेखर राव यांनी मुंबईत शरद पवार यांच्या निवासस्थानी जात त्यांच्याशी चर्चा केली होती.
अजित पवारांची नाराजी पुन्हा उघड
शरद पवारांच्या उपस्थितीत सोडले व्यासपीठ
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सर्वकाही आलबेल नाही. याचमुळे दिल्लीत आयोजित अधिवेशनात मोठा गोंधळ दिसून आला आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीतच महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नाराजी दिसून आली. अजित पवारांना संबोधनासाठी व्यासपीठावर बोलाविण्यात आले असता ते उठून निघून गेले आणि परतलेच नसल्याचे समजते. यादरम्यान अजित पवार यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. अजित पवारांच्या या कृतीमुळे राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात शरद पवार यांच्या नंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना संबोधनाची संधी देण्यात आली. त्यानंतर अजित पवार यांना संबोधनासाठी बोलाविण्यात आले, परंतु ते नाराज होत अधिवेशनातूनच बाहेर पडल्याचे सांगण्यात येत आहे. अजित पवार हे व्यासपीठावरून जात असल्याचे दिसताच त्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे.
या अधिवेशनात शरद पवार देखील उपस्थित होते. त्यांच्यासमोरच कार्यकर्त्यांना शांत होण्याचे आवाहन करण्यात आले. अजित पवार यांची नाराजी दूर करण्याची जबाबदारी सुप्रिया सुळे यांना देण्यात आल्याचे समजते.