ऑनलाईन टीम / तरुण भारत :
एकनाथ शिंदेंना शिवसेनेत मोठा मान होता. मे महिन्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदेंना मुख्यमंत्रीपद हवे आहे का?, अशी सरळसरळ विचारणा केली होती. मात्र, त्यावेळी त्यांनी नाटक केले आणि शेवटी व्हायचे ते झाले. 20 मे रोजी त्यांनी बंड केले. मुख्यमंत्र्यांनी मोह सोडलाय, जिद्द नाही, असे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
सेनेतील बंडानंतर आदित्य ठाकरेंनी आज सांताक्रूझमध्ये मेळावा घेतला. या मेळाव्यात बोलताना ते म्हणाले, पक्षात मान असतानाही शिंदे नाराज होते. त्यांची नाराजी काही दिवसांपासून स्पष्ट दिसत होती. त्यामुळे मे महिन्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदेंना मुख्यमंत्रीपद हवे आहे का? अशी विचारणा केली. मात्र, त्यांनी नाटक करत या फाईल्स थांबवल्या, त्या फाईल्स थांबवल्या अशी नाटकं केली. शेवटी 20 मे रोजी त्यांनी बंड केला. बंड करणाऱ्यांनी मान सन्मान गमावला आहे.
शिवसेनेने आमदारांना काय कमी केलं होतं, आरशात बघतानाही त्यांना आता लाज वाटत असेल. बिकाऊ लोकांनी पक्ष सोडला. शिवसैनिकांनी नाही. राज्यसभा निवडणुकीत संजय पवारांना पाडण्याचे कामही या फुटीर लोकांनीच केलं आहे. गद्दारांना आता क्षमा नाही. अजूनही ज्यांना जायचे आहे, त्यांना दरवाजे खुले आहेत. ज्यांना यायचे आहे, त्यांनाही दरवाजे उघडे आहेत. पण विकले गेलेल्यांना पक्षाचे दरवाजे बंदच असतील, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.