लोकमान्य दिवाळी किल्ला स्पर्धेचे बक्षीस वितरण थाटात : शिवाजी महाराजांची प्रत्येक कृती तरुणाईसाठी नेहमीच प्रेरणादायी
बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराजांनी 400 वर्षांपूर्वी गाजविलेला पराक्रम, साहस आजच्या पिढीलाही प्रेरणादायी ठरतो. शिवरायांच्या पराक्रमाच्या गाथा ऐकल्या तरी अंगावर शहारे येतात. डिजिटल युग आले, परंतु शेकडो वर्षांपूर्वी घडलेला इतिहास मात्र आजही तसाच आहे. त्यामुळे भरकटणाऱ्या तरुण पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांशिवाय पर्याय नाही, असे विचार लोकमान्य सोसायटीचे संचालक पंढरी परब यांनी व्यक्त केले. लोकमान्य सोसायटीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी किल्ला स्पर्धेतील विजेत्यांना बुधवारी बक्षीस वितरण करण्यात आले. कोनवाळ गल्ली येथील लोकमान्य रंगमंदिर येथे झालेल्या कार्यक्रमात पंढरी परब यांनी बालचमूंना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, आजच्या तरुण पिढीला शिस्त लावायची असेल तर शिवाजी महाराजांचा पराक्रम शिकविणे गरजेचे आहे. आजही जगात छत्रपतींना मॅनेजमेंट गुरु म्हणून ओळखले जाते. त्यामुळे त्यांची प्रत्येक कृती तरुणाईसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. लोकमान्य सोसायटीचे उपाध्यक्ष अजित गरगट्टी, संचालक पंढरी परब, गजानन धामणेकर, सुबोध गावडे, सीएफओ निवृत्त कर्नल दीपक गुरुंग, असिस्टंट जनरल मॅनेजर सी. आर. पाटील यांनी विजेत्यांना रोख रक्कम व स्मृतिचिन्हांचे वितरण केले. शहापूर, अनगोळ, टिळकवाडी व बेळगाव शहरांतर्गत ही स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये शंभरहून अधिक मंडळे तसेच बालचमूंनी सहभाग घेतला होता. हट्टीहोळ गल्ली, शहापूर येथील बालचमूंना ‘गडांचा राजा’ होण्याचा मान मिळाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक विनायक जाधव व मयूर खटावकर यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सतीश गोडसे, उमेश कासेकर, भरमा कोळी, किशोर हळदणकर, विक्रम कणबरकर यांनी परिश्रम घेतले.
पुढील वर्षी आंतरशालेय…
आजच्या युवा पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची माहिती मिळावी, या उद्देशाने लोकमान्य सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर यांच्या प्रेरणेतून लोकमान्य दिवाळी किल्ला स्पर्धा आयोजित केली जात आहे. आतापर्यंत विभागांतर्गत ही स्पर्धा आयोजित केली जात होती. पुढील वर्षापासून शहरातील आंतरशालेय स्तरावर शिवकालीन स्पर्धा आयोजित केली जाणार असल्याचे लोकमान्यतर्फे सांगण्यात आले.