पोस्टमनना सेवेतून कमी केल्याचा आमदार बोरकर यांनी विचारला जाब
वार्ताहर/ पणजी
राज्यातील टपाल खात्यात रोजंदारीवर काम करणाऱया आठ गोमंतकीय पोस्टमनना कोणतेही कारण न देता तडकाफडकी काढून टाकल्याच्या निषेधार्थ गोवा रिव्होल्युशनरी पार्टीचे आमदार विरेश बोरकर व कार्यकर्त्यांनी पणजी पाटो येथील मुख्य टपाल कार्यालयात जाऊन घेराव घालून जाब विचारला. यावेळी वरिष्ठ अधिकारी एम. नरसिंह स्वामी, सहाय्यक अधीक्षक अजय के. जाधव यांच्यावर कार्यकर्त्यांनी प्रश्नांचा भडिमार केला. मात्र त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही.
टपाल कार्यालयात गेली कित्येक वर्षे प्रामाणिकपणे पोस्टमन म्हणून काम करणारे आठ पोस्टमनना कामावरून काढून महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा राज्यातील पोस्टमनची भरती केली आहे. वास्तविक महाराष्ट्र गावा प्रांत असा विभाग टपाल कार्यालय जोडले आहे. अशावेळी अनेक उमेदवारांच्या मुलाखती कोल्हापूर येथे घेतल्या जातात. त्यात मराठी, इंग्रजी तसेच कोकणी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक असताना फक्त मराठी विषयात 90 टक्के गुण मिळविलेल्या कर्नाटक, तेलंगणा व महराष्ट्र राज्यातील उमेदवारांचीच इतर पदावर भरती केली आहे. त्यांना पोस्टमन पदावर घेण्यात आल्याचेही निदर्शनास आले आहे.
काढून टाकलेल्या गोमंतकीय पोस्टमन गेली पाच ते पंधरा वर्षे पोस्टमन म्हणून प्रामाणिकपणे काम करीत होते. त्यांना एकाही अधिकाऱयांनी कोल्हापूरला जाऊन मुलाखती द्या असे सांगितले नाही. हा गोमंतकीय पोस्टमनवर अन्याय आहे. त्यांचे वय 45 वर्षांहून अधिक आहे. त्यामुळे त्यांना इतर कोठेही नोकरी मिळणे अशक्य होऊन उपासमारीची पाळी आली आहे. त्यांचा संसार उघडय़ावर येणार आहे, असे यावेळी आमदार विरेश बोरकर यांनी अधिकाऱयांना पटवून दिले.
वरिष्ठ अधिकारी स्वामी म्हणाले की, आम्ही त्या आठही पोस्टमनना कामावर घेऊ शकत नाही. तुम्ही दिल्लीला जाऊन स्पष्टीकरण मागा किंवा संबंधित केंद्रीय मंत्र्यांना जाऊन विचारा. यावेळी कार्यकर्ते संतापले. ते म्हणाले की, टपाल निरीक्षकांना विचारल्यास ते म्हणतात पणजीत जाऊन जाब विचारा आणि तुम्ही म्हणतात दिल्लीला जाऊन विचारा हा काय प्रकार आहे, असा सवाल यावेळी केला.
टपाल खात्यात मोठा घोटाळा झाला आहे. सदर आठही पोस्टमनना सेवेत न घेतल्यास पक्षाला गंभीर पाऊल उचलावे लागेल. तसेच गोमंतकीय जनता जागृत असून असले प्रकार खपवून घेणार नाही, असा इशारा आमदार बोरकर यांनी केला आहे. दरम्यान आमदार बोरकर यांनी सादर केलेले निवेदन वरिष्ठ अधिकाऱयांकडे पाठवून देणार असल्याचे अधिकारी स्वामी यांनी सांगितले.