डिजिटल व्यवहार वाढले, 75 टक्के आजही रोखीने घेतात किराणा साहित्य
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतामध्ये करण्यात आलेल्या नोटाबंदीला आता 6 वर्षे पूर्ण झाली आहेत. वर्ष 2016 मध्ये रात्री 8 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 वाजल्यापासून 1000 आणि 500 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली होती. या ऐतिहासिक निर्णयानंतर 1000 रुपयांऐवजी 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्या होत्या. या निर्णया संदर्भात आजच्या घडीलाही अनेकांच्या मनात प्रश्न आहे की, नोटाबंदीने सरकारचे लक्ष्य साध्य झाले का? यासंदर्भातला हा उहापोह.
नोटाबंदीमधून काय साध्य झाले?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) च्या आकडेवारीनुसार, अवैध ठरलेले जवळजवळ संपूर्ण पैसे (99टक्केपेक्षा जास्त) बँकिंग प्रणालीमध्ये परत आले आहेत. अवैध ठरलेल्या 15.41 लाख कोटी रुपयांच्या नोटांपैकी 15.31 लाख कोटी रुपयांच्या नोटा परत आल्या. केवळ नोटाबंदीमुळे बँकिंग व्यवस्थेबाहेरील किमान 3-4 लाख कोटी रुपयांचा काळा पैसा नष्ट होईल, अशी सरकारला आशा होती. मात्र हे सरकार आपल्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाही.
किती काळा पैसा वसूल झाला?
नोटाबंदीनंतर किती प्रमाणात काळा पैसा वसूल झाला आहे, याचे आकलन करणे कठीण आहे. परंतु फेब्रुवारी 2019 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी संसदेत सांगितले होते की, नोटाबंदीसह विविध काळय़ा पैशाविरोधी उपायांनी 1.3 लाख कोटी रुपयांचा काळा पैसा वसूल केला आहे. आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी त्यांच्या ‘आय डू व्हॉट आय डू’ या पुस्तकात नोटाबंदीचे कधीही समर्थन केले नसल्याचा खुलासा केला होता.
डिजिटल व्यवहार वाढले
नोटाबंदीनंतर देशात डिजिटल व्यवहार झपाटय़ाने वाढले आहेत. असे असूनही, 342 जिह्यांमध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार, 76 टक्के लोक आजही किराणा, रेस्टॉरंटची बिले आणि खाद्यपदार्थासाठी रोखीने व्यवहार करतात. याशिवाय, नोटाबंदीपासून आतापर्यंत लोकांकडे असलेली रोख रक्कम दीड पटीने वाढली आहे.
दैनंदिन गरजांसाठी रोखीचा वापर
बहुतेक कुटुंबे दैनंदिन गरजांसाठी रोख पैसे देतात. जवळपास एक चतुर्थांश कुटुंबांनी प्रवासादरम्यान रोख वापरली. त्याचवेळी, गेल्या वर्षी सर्वात कमी कुटुंबांनी गॅझेट खरेदीमध्ये रोख रक्कम वापरली. दागिन्यांसारख्या मालमत्तेच्या खरेदीमध्ये रोख रकमेचा वापर केला जात आहे. 8 नोव्हेंबर 2016 घोषणेनंतर, लोकांच्या रोख रकमेत घट झाली, परंतु जून 2017 पासून त्यात सातत्याने वाढ झाली.
500, 2000 च्या 6,849 कोटी नोटा छापल्या
आरबीआयने 2016 आणि 2000 पासून एकूण 500 आणि 2 हजारच्या 6,849 कोटी नोटा छापल्या आहेत. त्यापैकी 1,680 कोटींहून अधिक चलनी नोटा चलनातून गायब आहेत. या गहाळ नोटांची किंमत 9.21 लाख कोटी रुपये आहे. या गहाळ नोटांमध्ये त्या नोटांचा समावेश नाही ज्यांचे नुकसान झाल्यानंतर आरबीआयने नष्ट केल्या होत्या.
2000 च्या नोटांचे चलन कमी होत गेले
वर्षी 2017-18 या वर्षात देशात सर्वाधिक 2000 च्या नोटा चलनात होत्या. 2000 मध्ये टॅबबाजारमध्ये 33,630 लाख नोटा होत्या, ज्यांची संख्या वर्षानुवर्षे कमी होत गेली. भारतीय रिझर्व्ह बँक म्हणते की लोकांना 2000 ची नोट आवडत नाही, म्हणून 2019 मध्ये ती छापणे बंद केले, परंतु अनेक तज्ञांचे असे मत आहे की काळा पैसा जमा करण्यासाठी 500 आणि 2000 च्या नोटांचा सर्वाधिक वापर झाला. कदाचित त्यामुळेच 2000 च्या नोटांची छपाई बंद आहे.