पुणे / प्रतिनिधी :
वाहनावर महाराष्ट्र शासनाची पाटी लावून गांजाची तस्करी करणाऱ्या महिलेसह तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 1 कोटी 4 लाख रुपये किमतीचा तब्बल 520 किलो गांजा जप्त करण्यात आला. आरोपींनी आंध्रप्रदेशातून गांजा विकण्यासाठी आणला होता. गुन्हे शाखेच्या अंमली विरोधी पथक 2 ने पुणे नगर रोडवरील अमरसेल इंडिया कंपनीसमोर ही कारवाई केली.
संदीप बालाजी सोनटक्के (वय -29, रा. रायगड), निर्मला कोटेश्वरीमुर्ती जून्नरी (वय-36, रा. गट्टर, आंध्रप्रदेश), महेश तुळशीराम परीट (वय-29, रा. रायगड) असे ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. आरोपींवर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून हद्दीत गस्त वाढविण्यात आली आहे. त्यानुसार पथक गस्तीवर असताना आंध्रप्रदेशातून नगर रस्त्यावर कारमधून गांजा वाहतूक होणार असल्याची माहिती अंमलदार योगेश मांढरे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून नगर रस्त्यावर स्कॉर्पिओ आणि सेलेरिओ ही दोन संशयित वाहने थांबवली. वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये गांजा भरलेल्या बॅगा आढळून आल्या. त्यानुसार पोलिसांनी एका महिलेसह तिघांना ताब्यात घेतले. आरोपींच्या कारमध्ये 1 कोटी 4 लाखांचा तब्बल 520 किलो गांजा आढळून आला. पोलिसांनी गांजा, स्कॉर्पिओ, सेलेरिओ गाडी आणि मोबाईल असा तब्बल 1 कोटी 19 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
रस्त्यात कोणी अडवू नये म्हणून लढवली शक्कल
आरोपींनी कारमधून आंध्रप्रदेशातून गांजा आणला होता. पोलिसांना संशय येऊ नये, यासाठी त्यांनी कारवर महाराष्ट्र शासन नावाचा पाटी लावली होती. मात्र, पोलिसांनी चाणाक्षपणे या दोन्ही कार अडवून तपासणी करत आरोपींना ताब्यात घेतले.
गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे म्हणाले, आंध्रप्रदेशातून गांजाची वाहतूक होणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार पहाटेच्या दरम्यान दोन्ही संशयीत वाहने ताब्यात घेतली. त्यामध्ये 520 किलो गांजा आढळून आला आहे.