वृत्तसंस्था / पाटणा
बिहारमध्ये अररिया जिल्ह्यातील फोर्बेसगंज येथे एका सरकारी शाळेच्या माध्यन्ह आहारात विषारी साप पडल्याने विषबाधा होऊन अनेक मुलांची प्रकृती बिघडली आहे. त्यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामुळे पालक चिंताग्रस्त झाले असून प्रशासनाने या प्रकाराच्या चौकशीचा आदेश दिला आहे.
माध्यान्ह आहारात या शाळेच्या विद्यार्थ्यांना खिचडी दिली जात होती. खिचडी शिजवताना भांड्यात विषारी साप पडल्याने ती विषारी बनली. सुरवातीच्या अनेक विद्यार्थ्यांना ती तशीच वाढण्यात आली. त्यामुळे या विद्यार्थ्यांना उलट्या होऊ लागल्या. काही विद्यार्थी बेशुद्ध पडल्याचेही स्पष्ट करण्यात आले. ही बाब लक्षात येताच खिचडीचे वितरण थांबविण्याचा निर्णय शाळेने घेतला.
मात्र, तोपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे दिसून आल्याने, त्यांना त्वरित रुग्णालयात पोहचविण्यात आले. या विद्यार्थ्यांच्या पालकांनी या घटनेसाठी शाळेला आणि जिल्हा प्रशासनाला जबाबदार धरले असून या घटनेच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे. माध्यान्ह आहार तयार होत असताना त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
चौकशी सुरु
घटनेचे वृत्त कळताच जिल्हा प्रशासनाच्या महत्वाच्या अधिकाऱ्यांनी शाळेकडे धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली. पोलिसांनी चौकशीला प्रारंभ केला असून आहार तयार करणाऱ्या कंत्राटदाराची चौकशी केली जाणार आहे. राज्य सरकारने या घटनेची दखल घेऊन चौकशी अहवाल त्वरित देण्याचा आदेश दिला आहे.