सोशल मीडिया आणि तंत्रज्ञानाच्या उत्क्रांतीपूर्वी समाजाचा दृष्टीकोन खूपच मर्यादित होता. माणसाला ना जगाची जाण होती ना आपल्या समाजाबाहेरील लोकांशी त्याची ओळख होती. माणूस फक्त त्याच्या शेजाऱयांच्याबरोबर किंवा विशिष्ट सामाजिक कार्यक्रमांच्यावेळी आणि कामाच्या माध्यमातूनच नवीन संपर्क तयार करत असे. अशा परिस्थितीत, त्याचे ध्येय जगाचा भाग होण्याऐवजी आपल्या समाजाचाच भाग होण्यापुरते मर्यादित होते.
‘रद्द करा’ संस्कृती म्हणजे काय?
आज सोशल मीडियामुळे माणूस घरबसल्या जगाच्या कोणत्याही कोपऱयातील माणसांशी संवाद साधू शकतो व तेथील घडामोडींचीदेखील माहिती मिळवू शकतो. व्यक्त व्हायला आज फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर इत्यादी अनेक माध्यमे आपल्यासमोर सहज उपलब्ध आहेत. या माध्यमांनी जणू सामान्य माणसाला एक स्वतंत्र आवाज दिला आहे. जगातील सर्व क्षेत्रातील घडामोडींबद्दल आज ऑनलाईन समाजाचे मत तेवढेच महत्त्वाचे झाले आहे जेवढे जगातील व त्या विषयातील दिग्गज लोकांचे आहे. कारण सामान्य माणूस आज घरबसल्या समान विचारांच्या लोकांना एकत्रित आणून एक ऑनलाईन समुदाय निर्माण करून बऱयाच काही गोष्टी करू शकतो. त्यामुळे जगात होणाऱया प्रगतीबरोबरच माणसाला त्यातील होणारा अन्यायदेखील प्रकर्षाने जाणवू लागला आहे. एखादा व्हीडिओ आपण सहजपणे सोशल मीडियावर टाकला तरीही तो काही मिनिटांमध्ये व्हायरल होऊ शकतो आणि त्याचा परिणाम पूर्ण जगभरावरदेखील दिसू शकतो. ही सामाजिकदृष्टय़ा एक क्रांतिकारी आणि प्रगतीशील गोष्ट असलीतरी तितकीच विनाशक ठरताना दिसत आहे.
या सर्व सोशल मीडिया माध्यमांची रचना इतकी विचारपूर्वक केली आहे की ती कोणालाही आपल्या जाळय़ात अडकवू शकते. उदाहरणार्थ, सोशल मीडिया येण्यापूर्वी माणसांचा जो काही संवाद असायचा तो समोरासमोर नाहीतर पत्राद्वारे असायचा. दोन माणसांमध्ये समोरासमोर झालेला संवाद जास्त स्पष्ट असतो कारण त्यात कोणताही तिसरा पक्ष सामील नसतो. सोशल मीडियावर ना माणसाचा चेहरा दिसतो, ना स्पर्श मिळतो आणि ना आवाज ऐकू येतो. त्यामुळे बऱयाच वेळेला बोललेल्या गोष्टीचा चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो. त्यामुळे आपल्याला हेतूशिवाय सामाजिक वाद वाढताना दिसत आहेत. सर्वांना आज ऑनलाईन प्रमाणित व्हायचे आहे पण या व्यक्तिवादी दृष्टिकोनामुळे समाजातील असहिष्णुता वाढली आहे आणि त्यामुळे जन्म झाला आहे ‘रद्द करा’ संस्कृतीचा.
कोणती गोष्ट पटली नाही की त्याच्याबद्दल पूर्ण माहिती मिळवण्याआधीच समाज त्या गोष्टीला ऑनलाईनच रद्द करू लागला आहे. हे म्हणजे एखाद्याला तडीपार केल्यासारखेच आहे. स्वतंत्र आवाज असल्यामुळे विचार न करता माणसं कोणत्याही गोष्टीवर कोणत्याही प्रकारे प्रतिक्रिया देतात.
‘रद्द करा’ संस्कृतीचे परिणाम
फेब्रुवारी 2021 मध्ये रश्मी सामंत नावाची मुलगी ऑक्सफर्ड विद्यापीठ विद्यार्थी संघटनेची पहिली भारतीय महिला अध्यक्ष झाली होती. ही बातमी बाहेर पडल्यावर काही तासांमध्येच तिच्या व तिच्या पालकांच्या दहा वर्षापूर्वीच्या सोशल मीडिया पोस्ट व्हायरल केल्या गेल्या. दहा वर्षांपूर्वी बोललेल्या गोष्टीचा चुकीचा अर्थ काढून, वस्तुस्थिती न समजून घेता आणि तिचे मत न ऐकता, सोशल मीडियावरील लोकांनी तिला राजीनामा द्यायला लावला. गोष्ट यावर थांबली नाही. त्यानंतर तिला व तिच्या नातेवाईकांचा ऑनलाइन छळ सुरू केला आणि कारण नसताना तिच्या धार्मिक पार्श्वभूमीवर टीका केली गेली. या सगळय़ाचा तिच्यावर एवढा परिणाम झाला की ती भारतात परत आली आणि त्यानंतर तिला मानसिक त्रासामुळे रुग्णालयात दाखल करावे लागले. माणूस म्हणून आपण सगळेच कधी ना कधी चुकतो. म्हणून माणसाला एक नवीन संधी मिळू नये का? सोशल मीडियावर भूतकाळातील चूक सार्वजनिकरित्या उपलब्ध असली तरी याचा अर्थ असा नाही की आपण त्या व्यक्तीलाच बेदखल करून टाकावे. माणूस आपल्या चुकांमधूनच शिकतो आणि समाज म्हणून आपण एकमेकांना समजून घेणे आवश्यक आहे.
रश्मी सामंतसारखे अनेक लोक रोज या विनाशक संस्कृतीला बळी पडत आहेत. यामुळे त्या माणसाची समाजातील प्रतिमा तर खराब होत आहेच पण त्याचबरोबर मानसिक आरोग्यावरही त्याचा परिणाम होताना दिसत आहे. ही संस्कृती फक्त सामान्य माणसांपर्यंतच मर्यादित नाही. याचा फटका बऱयाच प्रसिद्ध नेत्यांना, अभिनेत्री, अभिनेत्यांना, उद्योजकांनादेखील बसला आहे.
एखाद्याला वाटेल की ही केवळ निरुपद्रवी टीका आहे, परंतु ती हळूहळू सायबर गुंडगिरीमध्ये बदलत आहे. मागचा-पुढचा विचार न करता क्षुल्लक कारणांसाठी लोक त्याच माणसांच्या विरोधात जाऊ लागले आहेत ज्यांना ते एकेकाळी आदर्श मानत होते. जे चूक आहे त्याला चूक म्हटलेच पाहिजे पण या ऑनलाईन माध्यमांचा वापर करून लोकांच्या मनामध्ये द्वेष पसरवणे अत्यंत घातक आहे. कोणताही माणूस पूर्णपणे बरोबर किंवा पूर्णपणे चुकीचा नसतो. मानवी वर्तनाला अनेक पैलू आहेत आणि ते समग्र दृष्टीकोन ठेवूनच हाताळले गेले पाहिजे. सतत डोळय़ापुढे दिसणाऱया नकारात्मक टीका वाचून आपले मनदेखील नकारात्मक होत चालले आहे का? सोशल मीडियावर मिळणाऱया टिपण्यांच्या/माहितीच्या आधारे स्वतःची किंमत मोजणे बंद केले पाहिजे. समीर सामंत लिखित ‘हीच आमुची प्रार्थना’ या गाण्यामधील शब्दरचना या ठिकाणी आठवतात,
हीच आमुची प्रार्थना अन हेच आमचे मागणे,
माणसाने माणसाशी माणसासम वागणे
धर्म, जाती, प्रांत, भाषा, द्वेष सारे संपू दे
एक नि÷ा एक आशा एक रंगी रंगू दे
सोशल मीडिया अजूनही शाप बनलेला नाही. सामान्य माणसासाठी ते आजही समाजात एक शक्तिशाली आणि महत्त्वाचे संसाधन आहे. पण सोशल मीडियावर काहीही टाकण्यापूर्वी आपण समाजाचा एक भाग म्हणून जागरूक झाले पाहिजे. कोणत्याही गोष्टीची किंवा बातमीची संपूर्ण शहानिशा केल्याशिवाय त्यावर निष्कर्ष किंवा टिप्पणी करणे टाळले पाहिजे. सकारात्मक आणि क्रांतिकारक बातम्यांना प्राधान्य देऊन, अर्धवट आणि नकारात्मक दृष्टिकोनाला रद्द केले पाहिजे. तरच समाज म्हणून या रद्द संस्कृतीतून सकारात्मक परिणाम आपल्याला मिळू शकतो.
-श्राव्या माधव कुलकर्णी