सोशल मीडिया म्हणजे नवसमाजमाध्यमे जीवनाचा अविभाज्य घटक बनली आहेत. फेसबुक, व्हॉट्सअपचा वापर हा जीवनावश्यक सवयींचा भाग बनत चालला आहे; सोशल मीडियामुळे आपल्याला वेगवेगळ्या लोकांशी आपले मुद्दे मांडता येतात व त्या विषयी चर्चेत सहभागी होताही येते. सोशल मीडियाचे अनेक चांगले फायदे आहेत व असतात हे आपण जाणतोच. मात्र सद्यस्थिती काही वेगळीच दिसत आहे. आजची बहुतांश तरुणाई फोनवरील संदेश वाचण्यात आणि त्यावर विचार करण्यात अनेक तास घालवतात असे निदर्शनास आले आहे. ही माध्यमे खुली मुफ्त व स्वस्त असल्यामुळे सतत कोणी ना कोणी फोटो, मेसेज, कमेंटस पोस्ट करतच असतात. कोणत्याही वेळी संभाषण किंवा संवाद सुरू करता येतो किंवा सहभागी होता येते. बहुतांश वेळा युझर आपल्या विचारांशी साधर्म्य असलेल्या बातम्या, वैचारिक लिखाण, फोटो, व्हीडिओ इ बाबी शोधत असतात. हे सुरू असतानाच समाजातील काही विकृत मनोवृत्तीची लोकं सामाजिक सलोखा बिघडवणे, हिंसक कृत्य करण्यास, चुकीचे वर्तन करण्यास प्रवृत्त करणे असे प्रकार ह्या माध्यमांद्वारे घडवून आणण्याचा प्रयत्न करत असतात. त्याचबरोबर वैयक्तिक स्वार्थ जपण्याचा प्रयत्नही या माध्यमातून होतात. त्यामुळे ही समाजमाध्यमे फायद्याबरोबर नुकसान करणारीही आहेत.
आपण हा मीडिया सकारात्मकतेने वापरण्याचा मार्ग अवलंबवायचा आहे, किंबहुना तसा प्रत्यत्न करावयाचा आहे, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. ह्या सोशल मीडियाचे फायदे आपल्याला माहित आहेत मात्र ही माध्यमे मानसिक संतुलन बिघडवू शकतात हेही लक्षात घेणे आवश्यक आहे. सोशल मीडियामुळे व्यक्ती संकुचित विचारांच्या, मानसिकतेच्या व नकारात्मक विचारांच्या बनत चालल्या आहेत का याचा शोध संशोधक घेत आहेत. अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठातील संशोधकांनी विविध बाबी व मुद्दे विचारात घेऊन संशोधन केले आहे. या अभ्यासासाठी फेसबुक ह्या सोशल मीडियाचा वापर केला गेला. युझर्स काही विशिष्ट संदर्भातील माहितीची निवड करतात आणि ती लोकांबरोबर शेअर करतात. मात्र, उर्वरित सर्वच गोष्टींकडे दुर्लक्ष करतात असे दिसून आले. सोशल मीडिया वापरणाऱ्या लोकांमध्ये एक गोष्ट स्पष्टपणे जाणवली ती म्हणजे वापरकर्ते आपल्या विचारांशी साधर्म्य व पुरक असलेल्या गोष्टींशी व तत्वांशी निगडित असलेली माहितीच शोधत राहतात.
मग सोशल मीडियामुळे नैराश्यग्रस्त होऊ शकतो का? तर याचे उत्तर ‘हो’ असे येते. या संदर्भात नुकतेच एक सर्वेक्षण केले गेले. त्यानुसार 30 पेक्षा कमी वयोगटाटील मुलांना सोशल मीडियाच्या अती वापरामुळे चिंता, नैराश्य आदी बाबींना सामोरे जावे लागत आहे. अर्थात या वयोगटातील मुलांच्या आयुष्यात सोशल मीडिया हा महत्त्वाचा घटक बनला आहे. ह्या मुलांना स्मार्टफोन्स शिवाय संवाद साधता येत नाही असे आढळून आले आहे. स्नॅपचॅट, इन्स्टाग्राम, फेसबुक इ. सतत पाहणे, तसेच आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचे अपडेट सोशल मीडियावर टाकण्याच्या सवयी या तऊणांना जडल्या आहेत. वैयक्तिक संपर्क व संभाषण गमवून बसलेली ही तरूण पिढी एकाकीपणा, चिंता, नैराश्य, आदिंच्या आधीन होताना दिसत आहे.
ही तरुण मुले आपल्या आयुष्याचे चित्र चुकीचे बनवत आहेत असेही लक्षात आले आहे. सोशल मीडियाच्या वापरामुळे अनेक मानसिक तणावाच्या गोष्टी उद्भवत असतात. तरुण मुलांमध्ये सोशल मीडियावर पाहत असलेल्या अनेक गोष्टी आपल्यालाही मिळाव्यात ही भावना निर्माण होत असते. ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपल्याला पाहिजेत व यासाठी ही मुले ते सोप्या पद्धतीने कसं मिळवता येईल यावर भर देतात. जर त्या मिळाल्या नाहीत किंबहुना त्या मिळवू शकले नाहीत, तर मात्र ही मुले नैराश्याच्या गर्तेत अडकून जातात. आपले स्वत:चे आयुष्य सोशल मीडियावरील लोकांकडे पाहून रंगवण्यात गुंतलेली आहेत, याचा परिणाम म्हणजे ते मिळाले नाही तर वाईट होतो, हे या मुलांच्या लक्षातच येत नाही. मनाचा कल व संतुलन बिघडवण्याचा प्रकारही ह्या माध्यमांद्वारे होत आहे. या माध्यमांमधून युजर आपल्या वैयक्तिक भावनांना कोणत्याही अनोळखी व्यक्तींसमोर खुलेपणाने मांडतो. ज्याचा विपरित परिणाम अनेकवेळा होताना आढळतो. अशा मानसिकतेमध्ये राग येणे, मनाचे संतुलन ढळणे असे प्रकार होतात. काहीवेळ ही माध्यमे एकमेकांची उणीदुणी काढण्यासाठी वापरली जातात. गुगलसारख्या सर्चमुळे सहज उपलब्ध असलेल्या माहितीमुळे स्वत:ची निर्णय क्षमता व विचार क्षमता कमी होऊ लागली आहे. हेच कारण मानसिक संतुलन बिघडण्यास कारणीभूत ठरते आहे. ह्याला डिसिजन पॅरालिसिस असे म्हणतात. बरेचदा असंख्य पर्याय मिळाले की मेंदूला कशाला सामोरे जावे, याविषयी संभ्रम निर्माण होतो.
द्वेषभावनेची निर्मिती ही सोशल मीडियामुळेच होत आहे. ह्यामुळे अदृश्य रुपामध्ये एकमेकांशी जोडलेल्या गर्दीला विशिष्ट स्वार्थासाठी किंवा एखाद्या गैरसमजामुळे किंवा पूर्वग्रह यांच्यामुळे समाजात दुफळी माजण्यास वेळ लागत नाही. सोशल मीडियामुळे अराजकता माजली आहे ह्याची उदाहरणे आपल्याला आढळून येईल. सोशल मीडियाचा वापर इतर व्यक्तीविरोधात दुष्प्रचार आणि द्वेष पसरवण्यासाठी केला जातो. काहीवेळा एखाद्या व्यक्तीची बाजू सत्यता न पडताळता, बाजू न ऐकता सोशल मीडिया त्या व्यक्तीला गुन्हेगार ठरवून रिकामा होतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेल्या बदनामीमुळे अनेकांची आयुष्ये उद्ध्वस्त झाली आहेत. सायबर बुलिंग, सायबर स्टॉकिंग, इंटरनेट ट्रॉलिंग, अपमान, अश्लील पोस्ट, लहान मुलांचे शोषण केले जात आहे, तर काही वेळा सोशल मीडियावरील खाते किंवा अकाऊंटमधून ओळख करून देणाऱ्या माहितीची चोरी केली जाते. सामूहिक अनागोंदीमुळे कधी दंगल होते तर काही वेळा एखाद्या समूहामध्ये भयाची भावना निर्माण होते. काही वेळा अनावधानाने दहशतवादाला खतपाणी घातले जाते आहे.
सध्या सोशल मीडियामधून कोणाचीही सुटका नाही आहे. सर्वजण हा मीडिया वापरत आहेत. अनेक लोक ह्या मीडियावर लिहित आहे, व्हीडिओ करत आहेत, इमेजीस, मिम्स बनवत आहेत. हे सर्व करत असताना बऱ्याच वेळी कोणालाही देशद्रोही, देशभक्त किंवा हुशार, मूर्ख ठरवले जात आहे. मुळात सोशल मीडिया हा समाजाचा, पर्यायाने देशाचा विकास करण्यासाठी अत्यंत उपयुक्त साधन असता ते चुकीच्या प्रकारे वापरले जाणे हे दुर्दैव म्हणावे लागेल. लोकांमधील संवाद मुक्त, खुला व्हावा, तसेच त्यांच्यातील सहकार्यशक्ती दर्शवण्यासाठीच्या वरील दिलेल्या बाबींचा वापर केला तर एक साधन म्हणून सोशल मीडियाचा योग्य वापर व विकास होईल.
थोडक्यात काय तर सोशल मीडिया हा एक गंभीर प्रश्न बनत चालला आहे. चांगला परिणाम जितका होतो त्या पेक्षा वाईट परिणाम जास्त होताना दिसत आहे. जी शक्ती सोशल मीडियामध्ये आहे ती योग्य पध्दतीने वापरली गेली तर ठीक नाहीतर हे माध्यम समुद्रातील भरकटलेल्या जहाजासारखे कोणत्या दिशेला घेऊन जाईल हे सांगता येणार नाही.
– विनायक राजाध्यक्ष