अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्यांच्या गौरवप्रसंगी विठ्ठल हलगेकर यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी /खानापूर
तालुक्याच्या सर्वदूर दुर्गम भागात आशा कार्यकर्त्या व अंगणवाडी सेविकांचे योगदान मोलाचे आहे. तसेच गेल्या दोन वर्षाच्या कोरोना महामारीत या कार्यकर्त्यांनी जे योगदान दिले आहे. ते कदापी विसरता येणार नाही. ही बांधीलकी जपत महालक्ष्मी ग्रुपच्यावतीने ऋण व्यक्त करण्यात येत आहे. यासाठी त्यांचा गौरव करण्यात आम्हाला अभिमान वाटत आहे, असे उद्गार महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर यांनी याप्रसंगी काढले.
महालक्ष्मी ग्रुपच्यावतीने शिवगर्जना या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. तिसऱ्या दिवशीच्या प्रयोगादरम्यान तालुक्यात विविध स्तरावर योगदान दिलेल्यांचा महालक्ष्मी ग्रुपच्यावतीने गौरव करण्यात आला. यावेळी अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या, पत्रकार, वकील, सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांचा तसेच विविध सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूरचे दत्ताजीराव देसाई, युवा नेते शंभूराजे देसाई, रुक्मिणी हलगेकर, अप्पय्या कोडोळी, मार्केटींग सोसायटीचे चेअरमन गोपाळ पाटील, ता. पं. माजी सदस्य पांडुरंग सावंत, गुंजी ग्रा.पं. अध्यक्ष हणमंत मेलगे, वकील संघटनेचे अध्यक्ष ईश्वर घाडी, प्रा. भरत तोपिनकट्टी, वसंत देसाई, सुभाष देशपांडे, एच. एन. देसाई, शामल पाटील यासह इतर मान्यवर उपस्थित होते. लैला साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक सदानंद पाटील यांनी प्रास्ताविक करून या कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. तिसऱ्या दिवशीही शिवगर्जना महानाट्या पाहण्यास शिवप्रेमींनी गर्दी केली होती.