बेळगाव शहर परिसरात अनेक ठिकाणी केंदे : शेतकऱयांचे होतेय दुर्लक्ष : राज्य फलोत्पादन बायोसेंटरचीही स्थापना, आवश्यक सल्ला-मार्गदर्शन
प्रतिनिधी /बेळगाव
मातीचा पोत टिकून आहे की नाही किंवा पेरणी करणाऱया मातीत कोणती बियाणे लावावीत यासाठी माती परीक्षण महत्त्वाचे आहे. शेतकऱयांनी माती परीक्षण केल्यास पीक उत्पादनात वाढ होईल व त्या पिकासाठी कोणती खते वापरावीत याची माहितीही मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी सुजलाम, सुफलाम होईल यात शंका नाही. माती परीक्षण आणि त्याची गरज यासंदर्भात माहिती जाणून घेणेही तितकेच गरजेचे आहे. परीक्षण करण्यासाठीची केंदे सरकारी व खासगी पातळीवर अनेक ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यांचा शेतकऱयांनी लाभ घेण्याची गरज आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
गणेशपूर मार्गावर निजलिंगाप्पा शुगर इन्स्टिटय़ूटच्या शेजारी राज्य फलोत्पादन विभागातर्फे बायोसेंटरची स्थापना करण्यात आली आहे. या केंद्रात माती परीक्षणासाठीची सोय करण्यात आली आहे. शेतकऱयांना अतिशय कमी दरात मातीचे परीक्षण करून घेऊन त्याचा अहवाल तात्काळ दिला जातो. याचबरोबरीने जमिनीतील कमतरता लक्षात घेऊन ती भरून काढण्याच्या दृष्टिने आवश्यक तो सल्ला व मार्गदर्शन केले जाते. मात्र शेतकऱयांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे रासायिनक शेती आणि त्याचा परिणाम शेतीवर जाणवत आहे. तेंव्हा सेंद्रिय शेती आणि माती परीक्षण करून शेती केल्यास त्याचा उपयोग निश्चितच होईल, असे अधिकाऱयांचे म्हणणे
आहे.
तपासणीनंतर शेतकऱयाला अहवाल सादर
शिवाजीनगर येथील कृषी खात्याच्या कार्यालयांतर्गत माती परीक्षण व संशोधन विभाग स्थापन्यात आला आहे. या विभागामार्फत शेतकऱयांच्या शेतावर जाऊन मातीचे नमुने घेतले जातात. यासाठी या कार्यालयात शेतकऱयाला अर्ज करावा लागतो. हे नमुने संबंधित संशोधन केंद्रात आणून त्यावर विशेष तपासणी आणि संशोधन केले जाते. याचा अहवाल शेतकऱयाला दिला जातो. यानंतर त्यांना मार्गदर्शन करून कशाप्रकारे शेती करावी याची माहिती दिली जाते. मात्र तसे होताना दिसत नाही. त्यामुळे अनेकांना शेतीमध्ये नुकसानही सहन करावे लागते. याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.
मातीच्या बरोबरीनेच शेतासाठी वापरल्या जाणाऱया पाण्याच्या परीक्षणाची सोयही गणेशपूर मार्गावरील बायोसेंटरमध्ये उपलब्ध आहे. पाण्याचे नमुने या सेंटरमध्ये आणून द्यावे लागतात. अर्ज केल्यानंतर संबंधित नमुने कोणत्या प्रकारे घ्यावेत याची माहिती शेतकऱयांना दिली जाते. या माहितीनुसार अचूक नमुने आणून दिल्यास त्याचा अहवाल परीक्षणांती दिला जातो. या केंद्रात कृषी संशोधक आणि तज्ञांची नेमणूक करण्यात आली आहे. काही अपवादात्मक शेतकरी वगळता सर्वसामान्य शेतकरी परीक्षणाकडे वळत नाहीत, अशी माहिती या केंद्रातून उपलब्ध होत आहे.
संपूर्ण जिह्यातील शेतकऱयांच्या दृष्टिने बायोसेंटर तसेच कृषी खात्याची माती परीक्षण यंत्रणा अतिशय महत्त्वाची आहे. जमिनीचा आजार ओळखून तो दूर करण्याच्या दृष्टिने योग्य मार्गदर्शन घेणे आजच्या काळात महत्त्वाचे झाले आहे. विविध कारणांनी मातीचे प्रदूषण होऊन महत्त्वाचे घटक नष्ट होतात. ते पुन्हा निर्माण करण्यासाठी कोणते पीक घ्यावे, कोणत्या खतांचा वापर करावा, याची माहिती शेतकऱयांनी करून घेणे महत्त्वाचे
ठरते.
काही खासगी संस्थांमार्फतही परीक्षणाची सोय उपलब्ध होते. अन्नधान्य विकत घेऊन त्यांची निर्यात करणाऱया विदेशी कंपन्यांशी संलग्न संस्था शेतकरी वर्गालाही सोय मोफतरित्या पुरवू लागल्या आहेत. यामागे त्यांचा व्यावसायिक दृष्टिकोन असला तरी शेतकऱयाला जागरुक करणे आणि त्याच्याच जमिनीत पिकणारी उत्पादने योग्य असण्याची खबरदारी घेणे हे उद्देशही यामागे पहायला मिळतात. त्याचा लाभही अनेक शेतकरी घेऊ लागले
आहेत.
खरिप हंगामाला लवकरच सुरुवात होत आहे. आणखी काही दिवसांत यासाठीच्या मशागतीला प्रारंभ होणार आहे. या मशागतीच्या प्रक्रियेत माती परीक्षणाला महत्त्वाचे स्थान देऊन चांगली पिके घेण्यासाठी शेतकऱयांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.
माती परीक्षणाचा दर अत्यल्प
मातीचे परीक्षण करून न घेता शेती करणे याकडे अनेक शेतकरी आकर्षित होतात. दुर्लक्ष हे त्याचे प्रमुख कारण असते. शिवाय या परीक्षणासाठी जास्त खर्च येईल, असा गैरसमजही शेतकरी वर्गामध्ये पहावयास मिळतो. सरकारी योजनांच्या जागृतीचा अभाव हेही यामागचे प्रमुख कारण आहे. सरकारी यंत्रणांमध्ये शेतकऱयांसाठी प्रत्येक नमुन्याच्या परीक्षणाचा दर अत्यंत अत्यल्प असा आहे. एका नमुन्याला 50 रुपये किंवा त्यापेक्षाही कमी दर आकारला जातो. कोणत्या प्रकारची माती परीक्षणासाठी दिली जात आहे, यावरून हा दर ठरविला जातो.