जतेवर दुष्काळचे सावट; प्रकाशराव जमदाडे यांची मागणी
जत, प्रतिनिधी
जत तालुक्याला पावसाने हुलकवणी दिल्याने तालुक्यावर दुष्काळचे सावट गडद होत आहे. आज अखेर पाऊस न झाल्याने खरीप पेरा वाया गेला आहे. सरकारने आता तातडीने जत तालुक्यात जाणवरांच्या चाऱ्याची व्यवस्था करावी. तसेच शेतकऱ्यांना एकरी 25 हजार रुपयाची मदत द्यावी, अशी मागणी जिल्हा बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे यांनी केली आहे.
जमदाडे म्हणाले, तालुक्यात यंदा कसलाच पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरीपाची पेरणी झालेली नाही. पिण्याच्या पाण्यासाठी 3 गावात टँकर सुरू आहेत तर आणखी 4 गावांनी मागणी केली आहे. मान्सूनचे आगमन होऊन महिना होत आला तरी जत तालुक्यात अद्याप पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सद्यस्थितीला तालुक्यात तीन गावांमध्ये टँकर सुरू आहे. ही मागणी आता वाढणार आहे. शिवाय पावसाने चांगलीच ओढ दिल्याने शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट, जनावरांच्या चाऱ्याची टंचाई समोर येते आहे. तर तालुक्यातील 24 साठवण तलावा पैकी दहा तलाव मृतसंचालयाच्या खाली गेले आहेत.
दरम्यान, तालुक्यात डोन भागातील काही शेतकऱ्यांनी पावसाच्या भरवशावर खरीपाची पेरणी केली असून, तालुक्यात दहा टक्के पेरण्या झाल्या आहेत. खरिपाचे 74 हजार हेक्टर क्षेत्र असून, 7 जुलै पर्यंत पाऊस न झाल्यास यंदाचा खरीप पेरा वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच उसाचे देखील दहा हजार हेक्टर क्षेत्र पाण्या अभावी जळून जातानाचे चित्र दिसते आहे. त्यातच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावतो आहे. त्यामुळे तालुक्यातील वातावरण चिंतातुर आहे.
वास्तविक खरीप पीक हे जत तालुक्यातील महत्वाचे पीक आहे.पण पावसाअभावी सर्व खरीप हंगाम पूर्ण वाया गेला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. जी काही थोडी पेरणी झाली होती ती पिके वाळून जात आहेत. तरी सरकारने चारा डेपो किंवा चारा छावण्या सुरु कराव्यात. तसेच ऊस वाळून जात असल्याचे सर्वत्र दिसत आहे, या करिता शेतकऱ्यास एकरी 25000 हजार नुकसान भरपाई देण्याची गरज आहे, सरकारने या मागणीचा तातडीने विचार करावा असेही प्रकाशराव जमदाडे म्हणाले.