प्रवाशांची मागणी, पावसाला प्रारंभ, पर्यटकांच्या संख्येत वाढ
प्रतिनिधी /बेळगाव
पावसाला प्रारंभ झाल्याने जिल्हय़ातील विविध पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी पर्यटकांची संख्या वाढली आहे. यासाठी परिवहनने ‘बेळगाव दर्शन’ उपक्रम सुरू करावा. याअंतर्गत विविध पर्यटनस्थळांना भेटी देण्यासाठी बससेवा उपलब्ध करावी, अशी मागणी पर्यटकांतून होत आहे.
गत दोन वर्षात कोरोनामुळे हा उपक्रम बंद होता. त्यामुळे परिवहनला अधिक उत्पन्नापासून दूर राहावे लागले आहे. यंदा सर्वत्र जनजीवन सुरळीत होऊन पर्यटनस्थळे खुली झाली आहेत. त्यामुळे नागरिकांचा ओघ वाढत आहे. प्रवाशांच्या सोयीखातर पर्यटनस्थळांसाठी ‘बेळगाव दर्शन’ बससेवा सुरू करावी. जुलै ते सप्टेंबर दरम्यान अधिक पाऊस असल्याने आंबोली, तिलारी, गोकाक, गोडचिनमलकी आदी ठिकाणी भेट देणाऱया नागरिकांची संख्या अधिक असते. दरम्यान, कोकणात पाऊस सुरू असल्याने आंबोली येथील धबधबे प्रवाहित झाले आहेत. त्यामुळे आंबोलीच्या दिशेने जाणाऱया पर्यटकांची संख्या वाढली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी परिवहनने बससेवा सुरू करावी.
पावसाळय़ात गोकाक, गोडचिनमलकी धबधब्यांना भेट देणारे पर्यटक अधिक असतात. या काळात परिवहनकडून विशेष बस सवलतीच्या दरात प्रवाशांना उपलब्ध करून दिली जाते. शिवाय शालेय सहलींचेही आयोजन केले जाते. त्यासाठी आंबोली, तिलारी आणि गोकाक मार्गांवर विशेष बससेवा सुरू करावी. कोरोनापूर्वी ‘बेळगाव दर्शन’ उपक्रमांतर्गत बेळगाव बसस्थानकातून दहा ते पंधरा बस धावत होत्या. मात्र, कोरोनामुळे पर्यटनस्थळांवर निर्बंध आल्याने हा उपक्रम बंद झाला होता. पुन्हा यंदा या उपक्रमाला सुरुवात करावी, अशी मागणी पर्यटकांतून होत आहे.