तरुण भारतमधून वृत्त प्रसिद्ध होताच आली जाग
बेळगाव : बेनकनहळ्ळी गावाजवळील केंबाळी नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात आला आहे. तो कचरा काढावा, अशी मागणी या परिसरातील नागरिकांतून करण्यात आली. याबाबत तरुण भारतमधून वृत्त प्रसिद्ध होताच मंगळवारी या नाल्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. केंबाळी नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत आहे. कचऱ्यामुळे हा नाला बुजून गेला आहे. परिणामी पावसाळ्यामध्ये या नाल्यातील पाणी शिवारात जाणार आहे. या कचऱ्यामुळे या परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. चिकन दुकानदारही या ठिकाणी कचरा टाकत आहेत. त्यामुळे या परिसरातील जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. या नाल्याची खोदाई करावी, अशी मागणी करण्यात येत होती. याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या. तरुण भारतमधून वृत्त प्रसिद्ध झाले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी जेसीबीच्या साहाय्याने कचरा काढण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.