सैन्यप्रमुख जनरल मनोज पांडे यांची टिप्पणी ः चीनने सीमेवरील सैन्य घटविले नाही
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सैन्यप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी भारत-चीन सीमवाद वादासंबंधी महत्त्वाचे विधान केले आहे. पूर्व लडाखमधील स्थिती स्थिर असली तरीही अभूतपूर्व आहे, म्हणजेच येथील स्थिती कधी बदलेल हे सांगणे अवघड आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील आमच्या कारवाईचे अत्यंत सावधपणे आकलन करण्याची गरज आहे, जेणेकरून आम्ही आमच्या हितांची सुरक्षा करू शकू असे सैन्यप्रमुखांचे म्हणणे आहे.
चीनने सीमेवरील स्वतःच्या सैन्यात कमी केलेली नाही तसेच मूलभूत सुविधांच्या विकासाचा वेगही कमी केलेला नाही असे सैन्यप्रमुख पांडे यांनी चाणक्य डायलॉग्समध्ये थिंक टँक ग्रूपला संबोधित करताना म्हटले आहे. 2020 मध्ये चीन आणि भारताच्या सैन्यांदरम्यान तणाव वाढला होता. तेव्हापासून भारत-चीनने स्वतःच्या सैनिकांना पेट्रोलिंग पॉइंट-15 नजीक तैनात केले होते.
सीमा वादाच्या 7 पैकी 5 मुद्दय़ांवर चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्यात आला आहे. भारत-चीनमधील 17 व्या फेरीतील कोअर कमांडर स्तरीय बैठकीवर आम्ही विचार करत आहोत. यात दोन विशेष बिंदूंशी निगडित मुद्दय़ांवर तोडगा काढण्यावर लक्ष द्यावे लागणरा असल्याचे सैन्यप्रमुखांनी म्हटले आहे. त्यांचा बोलण्याचा रोख डेमचोक अन् देपसांगच्या दिशेने होता. 17 जुलै रोजी दोन्ही देशांदरम्यान कोअर कमांडर स्तरीय 16 व्या फेरीतील चर्चा पार पडली होती. त्यानंतर 8 सप्टेंबरपासून दोन्ही देशांचे सैनिक मागे हटण्याची प्रक्रिया सुरू झाली होती आणि 13 सप्टेंबरला ही प्रक्रिया पूर्ण झाली होती. पूर्व लडाखमध्ये मे 2020 च्या प्रारंभापासून चीनने आगळीक करण्यास सुरुवात केली होती. याचमुळे दोन्ही देशांदरम्यान तणाव वाढत गेला होता.
कृती अन् उक्तीत फरक
सैन्यप्रमुख पांडे यांनी चीनच्या दुटप्पी वर्तनावरून सतर्क केले आहे. चीनच्या कृती अन् उक्तीत फरक आहे. चिनी काय सांगतात आणि ते जे करतात यात मोठा फरक असल्याचे आम्ही सर्व जण जाणून आहोत. ते काय सांगत आहेत याकडे लक्ष देण्याऐवजी त्यांच्या कृतीकडे लक्ष देण्याची गरज आहे. सीमेवरील चिनी सैनिकांच्या संख्येत कुठलीच घट झालेली नाही, परंतु काही पीएलए ब्रिगेड परतल्याचे संकेत मिळाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
गलवान खोऱयात हिंसक झटापट
2020 मध्ये चीनने पूर्व लडाखच्या सीमावर्ती भागांमध्ये सरावाच्या नावाखाली सैनिकांना तैनात केले होते. त्यानंतर या भागातील अनेक ठिकाणांवर चिनी सैनिकांनी घुसखोरी केली होती. याच्या प्रत्युत्तरादाखल भारतीय सैन्याने या भागात मोठय़ा संख्येत सैनिक तैनात केले होते. 4 दशकांपेक्षा अधिक काळानंतर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गोळीबार झाला होता. याचदरम्यान 15 जून 2020 रोजी गलवान खोऱयात चिनी सैनिकांसोबत झालेल्या हिंसक झटापटीत 20 भारतीय सैनिकांना हौतात्म्य प्राप्त झाले होते.