मागण्या पूर्ण झाल्याशिवाय संप मागे घेणार नाही
पणजी : बालरथ कर्मचारी हे प्रामाणिकपणे आणि नि:स्वार्थ भावनेतून गेली अनेक वर्षे शालेय मुलांना घरी पोहचविण्याचे व शाळेत आणण्याचे काम चोखपणे बजावत आले आहेत. अगदी तुटपूंज्या पगारावर इतकी वर्षे सेवा देवूनही सरकार बालरथ कर्मचाऱ्यांकडे मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष करीत आलेले आहे. गत विधानसभा अधिवेशनात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बालरथ कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याबरोबरच वाढीव वेतन देणार असल्याचे सांगितले होते. परंतु हे वाढीव वेतन अजूनही मिळालेले नसल्याचे सांगत बालरथ कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानावर संप करीत असल्याचा एल्गार केला. पणजीतील आझाद मैदानावर सोमवारपासून बालरथ कर्मचाऱ्यांनी संपाला सुरवात करीत असल्याचे सांगितले. कामगार नेत्या स्वाती केरकर यांनी कामगारांच्या व्यथा मांडताना सरकारने दिलेले वचन व आश्वासन पाळावे, असे सांगितले. वेतन वेळेत मिळत नाही. शिवाय वेतनवाढही योग्य पद्धतीने होत नसल्याने बालरथ कर्मचाऱ्यांपुढे संपाशिवाय पर्याय नसल्याचे त्या म्हणाल्या. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बालरथ कर्मचाऱ्यांच्या मागण्या त्वरित मान्य करून त्यांना न्याय व दिलासा द्यावा, असे त्या म्हणाल्या. मागण्या पूर्णझाल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याचेही बालरथ कामगारांनी सांगितले.