“पुण्यातल्या दुकानात सर्वात दुर्लक्ष करण्यासारखी वस्तू म्हणजे गिऱहाईक’’ असं पु ल देशपांडे यांनी म्हटलेलं आहे. तोच धागा पुढे जोडून, “शिक्षण व्यवस्थेत सर्वात दुर्लक्षित केलेली वस्तू म्हणजे सर्वसामान्य विद्यार्थी/विद्यार्थिनी’’ असे म्हणता येईल. याची प्रचीती वारंवार येत असते. चुकांमधून माणूस शिकतो अशी एक धारणा आहे. परंतु, चुका करण्यास शालेय शिक्षण व्यवस्थेत मुभा नसते. उत्स्फूर्त भाषणापेक्षा पाठांतर केलेल्या भाषणाला बक्षीस मिळते. “आकाशाचा रंग कोणता?’’ या प्रश्नावर सर्वमुखी उत्तर “निळा’’ असे येते. परंतु “पांढरा’’, “करडा’’, “काळा’’ असे वेगळे उत्तर देणाऱयाचा आवाज क्षीण असतो. कोणी सगळा धीर एकवटून असे उत्तर देण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे हसे होते. कारण अपेक्षित उत्तर मागणारी ही व्यवस्था आहे. एकाच प्रश्नाचे वेगवेगळे उत्तर मिळू शकेल, असे प्रश्नच शाळेत विचारले जात नाहीत. विद्यार्थ्यांनी बिनधास्तपणे व्यक्त व्हावे असे तास शाळांमध्ये फार क्वचित प्रसंगी घेतले जातात. सर्वांनी शांत रहावे, शांतपणे ऐकून घ्यावे, प्रश्न विचारू नये अशी परंपरा भारतातील शालेय शिक्षण पद्धतीमध्ये रूढ आहे.
मराठी भाषिक विद्यार्थ्यांना भेडसावणारा मुख्य विषय म्हणजे इंग्रजी. आज अनेक गावातल्या शाळांमध्ये अशी परिस्थिती आहे की, आठवी-नववीच्या अनेक विद्यार्थ्यांना रोजच्या व्यवहारातील वाक्मये इंग्रजीमध्ये तयार करता येत नाहीत. त्यामुळे सेमी-इंग्रजी माध्यमात सायन्स हा विषय शिकणे आणि त्या विषयाची उत्तरे लिहिणे त्यांना अधिक कठीण जाते. शिवाय विज्ञान हा विषय पुस्तकात असतो आणि त्याचा रोजच्या जीवनाशी काही संबंध नसतो, अशी विद्यार्थ्यांची धारणा झालेली असते. एकूणच न आवडणाऱया विषयांमध्ये विज्ञान आणि इंग्रजी यांचा नंबर सर्वात वरचा असतो. परंतु हे विषय आवडत नाहीत असे सांगण्याचे धाडस मुलांमध्ये नाही. यावर काहीतरी केलं पाहिजे असा विचार करून एक सद्गृहस्थ एका शाळेत गेला. शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्याचे स्वागत केले. वर्ग सुरू होण्यापूर्वी मुख्याध्यापिकांनी वर्गातील नववीच्या वर्गातील मुला-मुलींना जरा धमकावणीच्या स्वरात सूचना केली, “आज या पाहुण्यांकडून तुम्ही विज्ञान आणि इंग्रजी हे विषय शिकणार आहात. तरी तुम्ही सर्वांनी हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवावे. आलेल्या पाहुण्यांचे भाषण शांत चित्ताने हालचाल न करता ऐकावे.’’ विद्यार्थ्यांच्या सहभागाशिवाय त्यांना वाक्मये तयार करण्यास कसे शिकवणार? विज्ञानासारखा विषय प्रश्नोत्तराच्या माध्यमातूनच शिकवायला हवा. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना त्याने सूचना केली की “आजच्या तासात आपण प्रश्नोत्तरे या स्वरूपात वाक्मये करण्यास शिकणार आहोत. तरी हाताची घडी आणि तोंडावरील बोट काढावे.’’ पाहुण्याने मागच्या बाकावर खाली मान घालून बसलेल्या एका मुलाला प्रश्न विचारला, “तुझा एक आवडता विषय आणि एक नावडता विषय सांग.’’ त्यावर मुख्याध्यापिका म्हणाल्या, “तो अप्रगत विद्यार्थी आहे, त्याला काही विचारू नका. हा पहिल्या बाकावर बसलेला संतोष आमच्या वर्गातला भावी शास्त्रज्ञ आहे, त्यालाच प्रश्न विचारा, तो बरोबर उत्तरे देईल.’’ विज्ञानाच्या तासाला सर्वांनी साचेबद्ध आणि बरोबर उत्तरे दिल्यावर ही मुले विज्ञान कसे शिकणार? त्यामुळे तो मुख्याध्यापिकांना म्हणाला, “बाई तुम्ही तुमच्या पद्धतीने शाळा चालवत आहातच, मी एक तासभर माझ्या पद्धतीने वर्ग चालवतो, चालेल?’’ बाईनी नाराजीने मान डोलावली आणि हात उडवले. त्यानंतर त्या पाहुण्याने मागच्या बाकावर बसलेल्या मुला-मुलींना काही प्रश्न विचारून बोलते केले. “प्रेशर कुकरमध्ये भात कसा शिजतो?’’ यावर अनेकांनी “दोन किंवा तीन शिट्टय़ा झाल्यावर’’ असे उत्तर दिले. परंतु एक मुलगी दबक्मया आवाजात म्हणाली, “प्रेशरमुळे शिजतो’’. अनेक मुले हसली तरी तिचे उत्तर बरोबर होते. बाईनी शिफारस केलेला भावी शास्त्रज्ञ इतर मुलांच्या हसण्यात सामील होता. “एक वर्ष 365 दिवसांचेच का असते, 240 दिवसांचे का नसते?’’ या प्रश्नावर “वर्षात 12 महिने असतात’’, “महिन्यात 30 दिवस असतात’’, “कारण 31 डिसेंबर झाल्याशिवाय नवे वर्ष सुरु होत नाही’’ अशी काहीबाही उत्तरे मिळाली. त्यात एका मुलाने क्षीण आवाजात सांगितले, “कारण पृथ्वीला फिरायला तेवढा वेळ लागतो’’. या वेगळय़ा उत्तरावर सर्व मुले मोठय़ाने हसली तरी त्याचे उत्तर बरोबर होते. शाळेत आलेल्या पाहुण्यांना गवसलेला तो हिरा कोणत्याही शिक्षकांचा लाडका नव्हता. पाहुण्याने त्या मुलाला पुढे बोलावल्यावर तो घाबरत घाबरत म्हणाला, “सॉरी सर, माझं चुकलं, पुन्हा मी बोलणार नाही.’’ त्याचे उत्तर बरोबर आहे याचा त्याला विश्वास दिल्यावर त्याने या विषयावर आणखी चार वाक्मये सांगितली, चार वर्षांनी येणाऱया 366 दिवसांच्या ‘लीप-ईयर’बद्दलही त्याने सांगितले. सर्वांसमोर त्याचे कौतुक करून पाहुण्यांनी त्याला एक पुस्तक बक्षीस दिल्यावर त्याच्या डोळय़ात पाणी तरळले. त्याचे कारण त्याला आतापर्यंत कोणी बोलायची संधीच दिली नव्हती. त्यामुळे उत्तरे बरोबर असूनही तो अबोल राहणेच पसंत करत होता. वेगळय़ाच मुलाला जाहीर शाबासकी मिळाल्यावर मुख्याध्यापक बाई नाराज होऊन वर्ग सोडून निघून गेल्या.
आज प्रत्येक वर्गात तुम्हाला अशी मुले सापडतील जी चूक होण्याच्या भीतीने उत्तरे देत नाहीत. शिक्षकांची लाडकी नसल्यामुळे त्यांना वर्गात तोंड उघडण्याची संधी मिळत नाही. अशी मुले दिवसेंदिवस एकेक बाक मागे सरकत जातात आणि त्यांचा आत्मविश्वास डळमळीत होतो. असे बहुसंख्य विद्यार्थी आज शिक्षण व्यवस्थेमध्ये दुर्लक्षित आहेत. 40 ते 50 पट संख्या असलेल्या वर्गात पोपटपंची करण्यात वाकबगार असे चार ते पाच विद्यार्थी शिक्षकांचे आवडते असतात. दोन-तीन विद्यार्थी शिक्षक सांगतील ती कामे करून शिक्षकांना खुश करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. अशा एकूण पाच ते आठ तथाकथित हुशार-चतुर विद्यार्थ्यांसाठीच शिक्षणाचे वर्ग घेतले जातात. वर्गातील निम्मे म्हणजेच पंचवीस विद्यार्थी एखादी इयत्ता मागे असतात आणि 10 ते 15 विद्यार्थी दोन ते तीन इयत्ता मागे असतात.
विज्ञानासारख्या विषयामध्ये पाया पक्का नसेल तर पुढील धडे समजणे विद्यार्थ्यांना जड जाते. इयत्ता सहावीमध्ये गती व गतीचे प्रकार (घसरगुंडी-झोपाळा यांची गती), बल आणि बलाचे प्रकार समजले नाहीत तर सातवीमध्ये ‘गती, बल व कार्य’ धडय़ामधील न्युटनचा पहिला गतिविषयक नियम कसा समजेल? त्यामुळे सायकलचे पेडल मारल्यानंतर कोणते चाक कोणत्या चाकाला गती देते हे कसे समजणार? सायकल चालवताना सहसा मागचा ब्रेक का दाबावा, याचा कार्यकारणभाव कसा समजणार? हाच मुलगा आठवीमध्ये गेल्यानंतर ‘बल आणि दाब’ हे सर्व प्रकरण डोक्मयावरून गेल्यावर “आपण जास्त वेळ एकाच ठिकाणी उभे राहू शकत नाही. मग एकाच ठिकाणी आठ आठ तास झोपू कसे शकतो?’’ या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही. सातवीमध्ये न्युटनचे नियम न समजलेला विद्यार्थी आठवीमध्ये अर्किमीडीजचे तत्व पचवू शकत नाही. त्यानंतर नववीमध्ये त्याला गतीचे नियम सूत्रात मांडून सोडवणे कठीण जाते आणि त्याला विज्ञान, विशेषतः भौतिकशास्त्र या विषयाचा तिटकारा येतो. अशाप्रकारे आठवी-नववीतल्या विद्यार्थ्यांना एखादा विषय मुळापासून समजावून सांगण्यास कोणाला वेळ नाही, इच्छाही नसावी. नववीच्या अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनींची समज किमान चार इयत्ता मागे आहे. अशा बहुसंख्य विद्यार्थ्यांकडे लक्ष देऊन त्यांना बोट धरून पुढे आणणारी व्यवस्था आजच्या शिक्षणात नाही.
ज्या विद्यार्थ्यांना पाठय़पुस्तकातील धडे समजत नाहीत अशा विद्यार्थ्यांना पुढे येण्यासाठी शिक्षण व्यवस्थेत कोणतीही तरतूद नसते. त्यामुळे त्यातील मुले घोकंपट्टी करून काही प्रश्नांच्या बाबतीत बाजू मारून नेतात. परंतु त्यांना विषय समजलेला नसतो. जसजसे ते पुढच्या इयत्तेमध्ये जातात, तसतसे मागे पडत राहतात, त्यांचा आत्मविश्वास गेलेला असतो. त्या विषयामध्ये गती येण्याची शक्मयता असूनही ही मुले मागे पडतात. पुढच्या इयत्तेत येणारे शिक्षक त्यांची चिंता करत नाहीत. चार-पाच हुशार मुलांनी अपेक्षित उत्तरे दिल्यानंतर एकूण वर्गास तो विषय समजला आहे असे समजले जाते आणि विषय न समजलेले विद्यार्थी गप्प राहण्याची सवय लावून घेतात. प्रत्येक विद्यार्थ्याचे सुप्त गुण हेरून त्याला खत-पाणी घालून त्याची कौशल्ये विकसित करणारी शिक्षण व्यवस्था अस्तित्वात आणण्याची गरज आहे. उषा उथप यांच्या आवाजाचा पोत वेगळा आहे हे न जाणून न घेता त्यांना शाळेच्या स्नेहसंमेलनामध्ये गायनाची संधी सातत्याने नाकारली गेली होती. शालेय शिक्षकांनी त्यांचा आवाज चांगला नाही, असेच उषा उथप यांच्या मनावर ठसवले. नसिरुद्दीन शाह यांना शाळेच्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात अभिनय करण्यास संधी नाकारली गेली, कारण त्यांना इतर विषयात उत्तम गुण नव्हते. लहानपणीच अफाट वाचन असलेल्या मीना चंदावरकर यांनी कोल्हापूरच्या शाळेत सातवी-आठवीमध्ये शिकताना वर्गात आलेल्या तपासणी अधिकाऱयाला “तुघलक वेडा नव्हता तर दूरदर्शी होता’’ असे बाणेदारपणे सांगितल्यावर त्या अधिकाऱयाने सर्वासमक्ष त्या मुलीची उगाचच कान उघाडणी केली होती. परंतु सातवीमध्ये शिकणाऱया ‘मीना’चा मुद्दा बरोबर होता. अशा खडतर प्रसंगास खंबीरपणे तोंड देऊन पुढे वाटचाल करणारी अशी उदाहरणे कमी असतात आणि शिक्षकांनी केलेला अपमान सहन न झाल्यामुळे गप्प राहणारी मुले संख्येने अधिक आहेत. त्या सर्वसामान्य मुलांची काळजी घेऊन त्यांच्या आवडीच्या विषयात गती देणारी शिक्षण व्यवस्था अस्तित्वात आली तर देश पुढे जाण्याची स्वप्ने आपण बघू शकतो.
– सुहास किर्लोस्कर