पुणे / वार्ताहर :
दुपारपर्यंत कडक ऊन, दुपारनंतर मुसळधार पाऊस असा ऊन पावसाचा खेळ सध्या राज्यात सुरु आहे. दरम्यान, सोमवारी राज्यातील अनेक भागाला पावसाने झोडपले आहे. पुढील दोन दिवस राज्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे.
अरबी समुद्राकडून येत असलेली बाष्पयुक्त हवा तसेच तामिळनाडू व लगतचा भाग, राजस्थान आणि हरियाणा व लगतच्या भागात हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. याच्या प्रभावामुळे देशभरात जोरदार पाऊस होत आहे. महाराष्ट्रातही अनेक भागांना रोज पाऊस झोडपून काढत आहे. दुपारपर्यंत कडक ऊन अन् त्यानंतर मुसळधार पाऊस असे काहीसे चित्र गेले चार दिवस राज्यात दिसत आहे. राज्यात पुढील दोन दिवस पावसाचा प्रभाव राहणार आहे. राज्यभर यलो अलर्ट देण्यात आला आहे. यानंतर मात्र त्याचा जोर कमी होणार आहे.
अधिक वाचा : रशियाने युक्रेनवर डागली 75 क्षेपणास्त्र; 11 जणांचा मृत्यू
परतीचा पाऊस पुढे सरकणार
वायव्य भारत तसेच उत्तरेकडील काही राज्यातून मान्सून माघारी फिरला आहे. अद्यापही तो माघारीचा मान्सून राज्यात पोहोचला नाही. पुढील चार ते पाच दिवसांत मान्सूनला गती मिळणार असून, तो मध्य भारत, वायव्य भारताच्या आणखी काही भागातून माघारी फिरेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.