नागरिकांची पाण्यासाठी भटकंती : पंधरा दिवसांत केवळ दोनच वेळा पाणीपुरवठा
वार्ताहर /जांबोटी
ओलमणी येथील सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना तांत्रिक बिघडामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून ठप्प झाल्याने पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्यामुळे, नागरिकांचे पाण्याअभावी हाल होत आहेत. ग्रामपंचायतीने त्वरित पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे जांबोटी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील ओलमणी गावची लोकसंख्या सुमारे 2500 च्या घरात आहे. सुमारे 12 वर्षांपूर्वी जलनिर्मल योजनेअंतर्गत, घरोघरी नळ पाणीपुरवठा योजना राबवून, ओलमणी गावापासून दोन कि. मी. अंतरावर असलेल्या मलप्रभा नदीतून जलवाहिन्यांद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात आला आहे. गावचा विस्तार मोठा असल्याने पहिल्यापासूनच गावासाठी दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतो. मलप्रभा नदीच्या पात्रात समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून या योजनेत उद्भवणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे गावाला अनियमित पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना ऐन उन्हाळ्dयात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
सध्या तीव्र उन्हाळ्dयाचे दिवस सुरू आहेत. त्यातच या भागात वळीव पावसाने देखील पाठ फिरवल्यामुळे विहिरी व कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत आहेत. नदीपात्रात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असला तरी कमी दाबाचा वीजपुरवठा, अनियमित वीजपुरवठा, जलवाहिन्या फुटणे आदी कारणांमुळे गावातील नळ पाणीपुरवठा योजनेत व्यत्यय येत असल्याचे ग्रामपंचायतचे म्हणणे आहे. पंधरा दिवसापूर्वी कमी दाबाच्या वीजपुरवठ्याने नळपाणीपुरवठा योजनेतील विद्युत मोटारीत बिघाड झाल्यामुळे पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. पंधरा दिवसात गावाला केवळ दोनच वेळा पाण्याचा पुरवठा करण्यात आल्यामुळे, गावात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. नागरिकांना पाण्यासाठी खासगी टँकरवरच अवलंबून रहावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तरी जांबोटी ग्रा. पं. पदाधिकाऱ्यांनी लक्ष घालून ओलमणी गावातील ठप्प झालेला नळपाणीपुरवठा सुरळीत करून नागरिकांचे पाण्यासाठी होणारे हाल दूर करावेत, अशी मागणी होत आहे.