साधारणपणे आठवडाभर अगोदरच मान्सूनचे यंदा अंदमानामध्ये आगमन झाले आहे. सागराकडून भूमीकडे वाऱयाचा बलशाली प्रवाह वाहतो आणि भारतीय उपखंडाला जीवन बहाल करतो. शेतीवर सगळी अर्थव्यवस्था अवलंबून असणाऱया देशाला मान्सूनचे महत्त्व किती आहे, हे वेगळे सांगायला नको. आगामी दोन-चार दिवसांमध्ये या नैऋत्य मोसमी वाऱयांसाठी अतिशय अनुकूल असे वातावरण आहे. त्यामुळे तो केरळमध्ये लवकर प्रवेश करेल, अशी सुचिन्हे आहेत. महाराष्ट्रातही वरूणराजा लवकर बरसू लागेल. पूर्वमोसमी पावसाच्या सरी उद्यापरवापासून राज्याच्या किनारपट्टीकडील भागासह अन्यत्र कोसळायला लागतील, असा ‘आयएमडी’चा अर्थात भारतीय हवामान खात्याचा अंदाज आहे. पावसाचा अंदाज व्यक्त करणे ही हवामानशास्त्रज्ञांच्या दृष्टीने अत्यंत कसोटीची गोष्ट असते. कारण हवामान कधी आणि कसे बदलेल हे भल्याभल्यांना छातीठोकपणे सांगता येत नाही. म्हणून हवामानाचा अंदाज बरोबर आल्याचे कौतुक जास्त आहे. अनेक प्रकारची निरीक्षणे आणि बदल सतत अभ्यासावे लागतात. त्यांची गुंतागुंत प्रचंड असते. ती उलगडणे हे सामान्य काम नाही. मान्सून लवकर येऊ शकतो, हा ‘आयएमडी’चा अंदाज यंदा अचूक ठरल्याने पावसाळा लवकर सुरू होईल. विदर्भामध्ये सध्या उष्णतेची लाट असली तरी मध्यमहाराष्ट्र, कोकण आणि मराठवाडय़ात पाऊस कोसळू लागेल. आसाम आणि मेघालयात मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. अरुणाचल प्रदेशातही हीच स्थिती आहे. या पावसामुळे आसामातील रेल्वेसेवा विस्कळीत झाली, कारण अनेक ठिकाणी रेल्वेमार्गच वाहून गेला. रस्त्यांचीही तीच स्थिती आहे. ब्रह्मपुत्रेने एकदा मनावर घेतले की सगळे वातावरणच बदलून जाते. नैऋत्य मोसमी वारे मागच्या पाच वर्षात उशिरानेच केरळात पोहचले आहेत. त्यामुळे कवी अनिलांनी ‘उशिरा आलेला पाऊस तळहातावर झेलून घ्यावा’, असे म्हटले असले तरी लवकर आलेल्या पावसासाठी दोन्ही हात फैलावून स्वागत करायला हवे. पूर्वमोसमी पावसाने महाराष्ट्राच्या काही भागात हजेरी लावायला सुरूवात केली असली तरी गुजरात, हरियाणा, दिल्ली, मध्यप्रदेशात त्याची हालचाल नाही. दिल्लीने तर मागच्या आठवडय़ात सर्वाधिक तापमानाची नोंद केली आहे. विदर्भातही तापमान चढतेच आहे. अकोल्यात पारा 44 तर यवतमाळमध्ये 45 अंशावर आहे. यवतमाळमध्ये वनक्षेत्र असूनही तापमानाची ही उंची आहे. थंड हवेचे ठिकाण समजले जाणारे महाबळेश्वरही 33 अंशावर पोहचले आहे. मान्सूनच्या वाटेत असनी चक्रीवादळाची आडकाठी होती. पण ते लवकर विरल्याने त्याची प्रगती होत आहे. चक्रीवादळामुळे हवेतील बाष्प शोषले जाते. साहजिकच तापमानामध्ये वाढ होते. राजस्थान, मध्यप्रदेशात गतपंधरवडय़ात तापमानाने उच्चांक गाठला होता, त्याला कारण हे वादळ होते. हवेतील वाफ, मिथेन आणि कार्बनडाय ऑक्साईडच्या उत्सर्जनामुळे तापमानामध्ये वाढ होत जाते. औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषणही त्याला कारणीभूत असते. हरितवायू परिणाम म्हणजे ‘ग्रीनहाऊस इफेक्ट’मुळे पृथ्वीचीच होरपळ होत आहे. प्रचंड संख्येने वाढलेली वाहने, इंधनाचे भरमसाठ ज्वलन, अतोनात सुरू असलेली जंगलतोड यामुळे वातावरण बिघडत चालले आहे. जागतिक परिषदांमधून त्याविषयी चिंता व्यक्त केली जाते, पण त्यावर उपाय करण्याच्यादृष्टीने कृती होत नाही. केवळ माणसांवरच नाही तर प्राण्यांवरही वाढत्या तापमानाचा परिणाम होतो. सोलापूर जिह्यात उष्माघातामुळे 11 मेंढय़ाचा मृत्यू झाला होता. तापमानामुळे हिमखंड वितळण्याचा वेग वाढत असल्याने समुद्राच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. अगदी कोकणातही समुद्र गावांच्यादिशेने आत सरकल्याचे निरीक्षण आहे. ऊर्जावापरावर मर्यादा आणि प्रदूषणकारी ऊर्जा वापर पूर्णपणे बंद करणे हे पर्याय आहेत. कोणत्याही आणि कितीही विपरित स्थितीशी जुळवून घेण्याची कला माणसाकडे आहे. पण हवामानाचे बदल वेगाने होत असतील तर ही कला उपयोगी पडणार नाही. पृथ्वीच्या ‘प्लॅनेटरी सपोर्ट सिस्टिम’मध्ये बदल होत असल्याचे दिसून आले आहेत. अनेक शतके लोटल्यावर त्यात सुधारणा होईल, असे हवामान बदलाचे अभ्यासक सांगतात. म्हणूनच, वेळेवर किंवा वेळेपूर्वी येणाऱया मान्सूनचे कौतुक व अप्रूप आहे. पूर्वमोसमी पावसाने गोवा, आसाम, तमिळनाडू, पश्चिम बंगालमध्ये चांगली हजेरी लावली आहे. सिक्किम आणि मेघालयातही त्याने सरासरी ओलांडली आहे. पुढच्या आठवडय़ात देशभरात मेघराजा बरसेल. उच्चांकी तापमानामुळे वाढवलेली चिंता कमी होण्यास त्यामुळे मदत होईल. सध्या अंदमान-निकोबार बेटे त्याने व्यापून टाकली आहेत. उद्या तो बंगालच्या उपसागरात पोहचेल. दरवषी नेमाने येणारा मान्सून ही भारतीय उपखंडातील महत्त्वाची घटना आहे. त्यामुळे या पावसाचा वेध घेत किंवा माग काढण्याचा प्रयत्न अनेक शास्त्रज्ञ करतात. अलेक्झांडर प्रेटर या लेखकाने तर मान्सूनचा पाठलागच केला होता. मात्र, भारतीय प्राचीन ग्रंथांमध्ये पर्जन्यसुक्तामध्ये पावसाची माहिती दिली आहे, इतकेच नव्हे तर त्याची स्तुती केली आहे. याचा अर्थ मान्सूनची माहिती वेगळय़ा पद्धतीने ऋग्वेदातही आढळते. आपले ऋषी-मुनी किती प्रगत होते, त्याचे हे उदाहरण म्हणावे लागेल. भारतीय मान्सूनची नियमितता हा जगाला हेवा वाटायला लावणारा प्रकार आहे. त्याला कितीही लहरी म्हटले तरी तो येणारच नाही, असे होत नाही. 1972 हे सर्वाधिक दुष्काळी वर्ष होते, त्या साली 180 मिमी पावसाची नोंद झालेली आहे. इस्त्राईलसारख्या देशात दरवषी त्याहून कमी पाऊस कोसळतो. सर गिल्बर्ट वॉकर या ब्रिटिश शास्त्रज्ञाने भारतीय हवामानाचा अत्यंत बारकाईने अभ्यास केला. आपल्याकडे कोसळणाऱया पावसाचा अभ्यास केला. त्यांच्या गणिती निष्कर्षांचा खूप फायदा विद्यमान हवामान तज्ञांना होतो हे महत्त्वाचे आहे. बाष्पयुक्त वायुराशींची ही फळी जेवढे जास्त दिवस भारतात राहील, तेवढा पर्जन्यलाभ आपल्याला होतो. कमी दाबाचा पट्टा, चक्रीवादळे, प्रतिरोध वैशिष्टय़ांना तोंड देत इथली भूमी तो सुजलाम् सुफलाम् करेल, असे वाटते.
Previous Articleमुंबईच्या पदरी पुन्हा पराभव, पुन्हा निराशा!
Next Article 24 वर्षांच्या उच्चांकी स्तरावर महागाई
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.