पुणे / प्रतिनिधी :
महाराष्ट्राचा कमाल तापमानाचा पारा वाढला असून, अकोल्यात शनिवारी सर्वाधिक 44.4 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले.
राज्यात उन्हाची काहिली वाढली असून, अनेक भागात 40 पेक्षा अधिक तापमान नोंदविण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी कमाल तापमानात घट नोंदविण्यात आली होती, मात्र कोरडय़ा हवामानामुळे पुन्हा एकदा उष्मा वाढला आहे. मुख्यत्त्वेकरून मराठवाडा व विदर्भात तापमान अधिक नोंदविण्यात येत आहे. पुढील काही दिवस हे तापमान कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
मान्सूनसाठी पोषक स्थिती
मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती असून, पुढील 2 ते 3 दिवसांत तो अंदमान निकोबार बेटे, अंदमान समुद्र, दक्षिण बंगालचा उपसागर व्यापेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
राज्यात शनिवारी नोंदविण्यात आलेले कमाल तापमान पुढीलप्रमाणे
पुणे 38.5, जळगाव 43.5, कोल्हापूर 38.2, महाबळेश्वर 33.2, नाशिक 37.5, सांगली 40.4, सातारा 39.2, सोलापूर 42.5, मुंबई 33.5, रत्नागिरी 34.4, पणजी 35.5, डहाणू 33.7, औरंगाबाद 41.4, परभणी 43.4, नांदेड 41.8, बीड 41.9, अमरावती 42.6, बुलढाणा 40.7, ब्रह्मपुरी 42.2, चंद्रपूर 43.4, गोंदिया 42.6, नागपूर 43, वाशिम 42.2, वर्धा 44, यवतमाळ 41.5.