आठ ते दहा वारकरी गंभीर जखमी
मणेराजूरी / वार्ताहर
तासगांव- कवठेमहांकाळ राज्य महामार्गावर मणेराजूरी पवार वस्तीजवळील वळणावर वारकऱ्यांना घेवून जाणारा टेम्पो उलटला. यामध्ये आठ ते दहा वारकरी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये केले आहे. हा अपघात सोमवारी दुपारी दोनच्या दरम्यान झाला. सर्वजण शिराळा तालुक्यातील भागाईवाडी व परिसरातले आहेत.
अधिक वाचा- आमदार नारळ फोडून जाताच, मटण मार्केटच्या वादातून मिरजेत दोन गटात राडा
या राज्यमार्गावर रखडलेल्या दीड किलोमीटर रस्ता खुपच धोकादायक झाला असून या रखडलेला रस्त्यावर तीन धोकादायक वळणे आहेत. या रस्त्यावर गेल्या पाच वर्षात पंचवीस ते तीस जणांचा बळी गेला आहे. या रस्त्यावर आणखी किती जणांचा बळी घेणार ?
याबाबत घटनास्थळावरून समजलेली महिती अशी की, पंढरपूरहून आषाढी एकादशी यात्रा संपवून वारीतील सुमारे 33 भाविकांना घेवून टाटा टेम्पो क्रं (MH10K 8096 ) हा बत्तीसशिराळ्याकडे चालला होता. परंतु पवार वस्तीजवळील वळणावर चालकाचा ताबा सुटून हा टेम्पो पलटी झाला. यामध्ये टेम्पोमधील वारकरी एकमेकांच्या अंगावर पडले तर काही टेम्पोच्या बाहेर फेकले गेले. या अपघातात सुमारे आठ ते दहा वारकरी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी वारकऱ्यांना तातडीने तासगांव, मिरज, सांगली येथील हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी तातडीने तासगाव ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. साहिल जमदाडे, रुग्णवाहिकेसह धाव घेवून जखमीना हॉस्पीटलमध्ये भरती केले. तर इतर भाविकांची मणेराजूरी येथील ग्रामपंचायतमध्ये सोय करण्यात आली आहे.
यापुर्वी याच वळणावर फरशीचा ट्रक उलटून दहा जणांचे बळी गेले होते. तर मोटारसायकल व इतर अपघात होवून बरेच बळी गेले आहेत. तासगाव- कवठेमहांकाळ राज्य महामार्ग होवून तीन वर्षे पूर्ण झाले आहेत. परंतु मणेराजूरीजवळील खंडोबा ओढा ते पवार वस्ती पर्यंतचा दीड किलोमीटरचा रस्ता रखडला आहे. शेतकऱ्यांना जमीन अधिग्रहणाची भरपाई न मिळाल्यामुळे हा रस्ता रखडला असलचे समजते. त्यामुळे या दीड किमी रस्त्याची संपूर्ण दुर्दशा झाली आहे. आणखी किती जायबंदी व बळी, नुकसान झाल्यावर प्रशासन जागे होणार असा प्रश्न वाहनधारक व ग्रामस्थ करीत आहेत .