वाढत्या उष्म्यामुळे सर्वच फळांना मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
वाढत्या उष्म्याबरोबर हिरव्या पालेभाज्या आणि फळांना मागणी वाढली आहे. याबरोबरच फळांचा राजा आंबा देखील मोठय़ा प्रमाणात दाखल झाला आहे. त्यामुळे बेळगावकरांना हापूसची चव चाखता येत आहे. प्रुटमार्केटमध्ये विविध फळांबरोबर आंब्यांची आवक वाढली आहे.
किरकोळ बाजारात विविध फळांबरोबर आंब्याला देखील मागणी वाढली आहे. त्यामुळे विविध चौकांमध्ये आंब्याची विक्री सुरू आहे. होलसेल प्रुटमार्केटमध्ये केळी, सफरचंद, डाळिंब, पेरू, संत्री, मोसंबी, कलिंगड, आंबा आदी फळांची रेलचेल सुरू असलेली पहायला मिळत आहे. मागील दोन वर्षात कोरोनामुळे उन्हाळय़ातील फळांचा सिझन वाया गेला होता. मात्र यंदा बाजारपेठ सुरळीत झाल्याने उन्हाळय़ातील फळांची विक्री पूर्वपदावर आली आहे. शिवाय प्रुटमार्केटमध्ये दैनंदिन उलाढाल वाढली आहे. होलसेल प्रुटमार्केटमध्ये आंबा 600 ते 700 रुपये डझन, द्राक्षे 100 ते 150 रुपये 8 किलो, कलिंगड 7 ते 8 रुपये किलो, डाळिंब 50 रु. किलो तर चिकू शेकडा 500 दराने विक्री होत आहे.
होलसेल प्रुटमार्केटमध्ये आंब्यांची आवक वाढली आहे. विशेषतः कोकणातील वेंगुर्ला, रत्नागिरी, मालवण, देवगड येथील हापूस दाखल झाला आहे. त्याबरोबर कर्नाटकातील धारवाड आणि इतर ठिकाणचा आंबा मोठय़ा प्रमाणात दाखल झाला आहे. मात्र लग्नसराई, यात्रा यामुळे आंब्याला म्हणावी तशी मागणी नसल्याचे व्यापाऱयांनी सांगितले. याबरोबरच महाराष्ट्र, आंध्रपदेश, केरळ आदी ठिकाणांहून फळांची आवक वाढली आहे. वाढत्या उष्म्यामुळे सफरचंद, कलिंगड, संत्री, मोसंबी आदी फळांना मागणी वाढली आहे.