ऑनलाईन टीम / तरुण भारत :
एकतर्फी प्रेमातून एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीची गळा चिरुन हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबाद शहरातील देवगिरी महाविद्यालयाच्या परिसरात घडला.
ग्रंथी सुखप्रीत कौर असे मृत विद्यार्थीनीचे नाव आहे. तर शरण सिंग असे मारेकऱ्याचे नाव आहे. मृत विद्यार्थिनी आणि मारेकरी दोघेही उस्मानपुऱ्यातील रहिवाशी आहेत. ते एकमेकांच्या ओळखीचेही होते. मृत विद्यार्थीनी बीबीएच्या प्रथम वर्षात शिकत होती. दुपारी एका कॅफेत दोघे बसले होते, तिथे त्यांच्यात वाद झाला. त्यामुळे कॅफेचालकाने त्यांना बाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर त्यांच्यात पुन्हा वाद झाला. तेव्हा मारेकऱ्याने त्याच्याजवळचे धारधार शस्त्र काढले. त्यावेळी विद्यार्थीनी जीवाच्या आकांताने पळू लागली. अखेर मारेकऱ्याने तिला जवळपास 200 फूट ओढत नेऊन तिची चाकूने गळा चिरुन हत्या केली.
घटनेनंतर मारेकरी शरण सिंग पसार झाला असून, पोलिसांची 3 पथके त्याच्या मागावर आहेत. या घटनेमुळे कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.