नागरिक हैराण, शीतपेयांना मागणी
बेळगाव : मागील काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. त्यामुळे नागरिक वाढत्या उष्म्याने हैराण झाले आहेत. पारा हळूहळू वाढत असून 38 अंशांवर पोहोचला आहे. येत्या दिवसांत पुन्हा तापमान वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाढत्या तापमानाने दैनंदिन जीवनावरही परिणाम होऊ लागला आहे. वाढत्या उष्म्यामुळे दुपारच्या वेळेत बाजारपेठेतील काही रस्तेही ओस पडू लागले आहेत. त्याचबरोबर शीतपेयांना मागणी वाढू लागली आहे. सरबत, कोकम यासह आईस्क्रीमलाही मागणी वाढत आहे. विशेषत: वाढत्या तापमानाचा आबालवृद्धांसह साऱ्यांनाच त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे पंखा आणि एसीचा वापर वाढला आहे. मागील आठवड्यात काही ठिकाणी वळिवाचा पाऊस झाला होता. त्यामुळे काहीकाळ गारवा जाणवला होता. मात्र, शहर परिसरात म्हणावा तसा वळीव बरसला नाही. त्यामुळे उष्म्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे थंडाव्यासाठी मोठ्या वळीव पावसाची प्रतीक्षा आहे. काही सामाजिक संघटनांनी शहरातील काही ठिकाणी पाणपोईची व्यवस्था केली आहे. गोंधळी गल्ली, रामदेव गल्ली, खडेबाजार, गणपत गल्ली, पांगुळ गल्ली आदी ठिकाणी पाणपोईची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे बाजारात येणाऱ्या नागरिकांना पाण्याची व्यवस्था होऊ लागली आहे.