बेळगावची जनता अक्षरशः वैतागली : रुग्णवाहिकांनासुद्धा मार्ग नाही, नागरिकांतून नाराजी
प्रतिनिधी /बेळगाव
मोठा गाजावाजा करून जिल्हा प्रशासनाने राज्योत्सवाची तयारी केली व सरकारच्या आदेशानुसार शहरात राज्योत्सव पारही पडला. परंतु हा राज्योत्सव म्हणजे संपूर्ण शहराला वेठीस धरणारा ठरला. ठिकठिकाणी प्रामुख्याने वर्दळीच्या रस्त्यांवर, चौकाचौकात डीजे लावून नाच करणारे तरुण आणि डीजेचा कर्णकर्कश आवाज यामुळे राज्योत्सवाने बेळगावकरांच्या सहनशक्तीचा अंत पाहिला.
राज्योत्सवासाठी जिल्हा प्रशासनाने गेल्या महिन्याभरापासून प्रयत्न सुरू केले होते. मात्र यावेळीही राज्योत्सव म्हणजे केवळ हिडीस प्रकार करून आणि कर्कश आवाजाचे डीजे लावून धिंगाणे घालण्याचा प्रकार ठरला आहे. यामुळे बेळगाववासियांतून जिल्हा प्रशासनाबद्दल आणि सरकारबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
कोणत्याही प्रकारचे प्रबोधन नाही किंवा राज्योत्सव म्हणजे काय? हे देखील माहिती नसल्याचे या राज्योत्सवातून दिसून आले. परजिल्हय़ातून कन्नड भाषिकांना बोलावून बेळगावात राज्योत्सव साजरा करण्यात आला. राज्योत्सव साजरा करून बेळगाव आपले आहे, हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न पुन्हा एकदा अयशस्वी ठरला आहे. राज्योत्सवासाठी शहरातील सर्वच मुख्य रस्ते अडविण्यात आले होते. त्यामुळे परराज्यातून तसेच तालुक्मयातून येणाऱया जनतेला नाहक त्रास सहन करावा लागला. यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. कर्कश आवाजाचे डीजे लावून केवळ धिंगाणा घालणे आणि त्यालाच राज्योत्सव म्हणणे, हे हास्यास्पद आहे. या राज्योत्सवामुळे रस्ते अडविण्यात आले होते. परिणामी रुग्णवाहिकांनाही मार्ग मिळाला नाही. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांतून याबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
लाल-पिवळा अनधिकृत ध्वज घेऊन केवळ मिरवून बेळगाव आपले आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा झाला. डीजेला परवानगी देताना कोणतेही नियम लादण्यात आले नाहीत. त्यामुळे कर्कश आवाजाचे डीजे लावण्यात आले होते. त्यामुळे वृद्ध, लहान मुलांना मोठा त्रास सहन करावा लागला. कित्तूर चन्नम्मा चौकाला लागूनच सिव्हिल हॉस्पिटल आहे. त्याचठिकाणी कर्कश आवाजाचे डीजे लावण्यात आले होते. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
केवळ मौजमजा करण्यासाठी बेळगावात दाखल
परजिल्हय़ांतून अनेक वाहने बेळगावात दाखल झाली. परजिल्हय़ातील कन्नड लोकांना आणण्यासाठी केएसआरटीसीने मोफत बसही सोडल्याचे बोलले जात होते. त्यामुळे केवळ मौजमजा करण्यासाठी बेळगावात दाखल होऊन मिरवणुकीत भाग घेऊन त्यानंतर सायंकाळी हे सर्वजण निघून गेले. बसबरोबरच जेवणाचीही सोय करण्यात आली होती. त्यामुळे डीजे लावून राज्योत्सव साजरा करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा झाला आहे. मात्र यामुळे बेळगावच्या जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.