एन्ट्री शुल्क रद्द करण्यासाठी गेटबंद आंदोलन : काहीवेळ भाजीमार्केटचा व्यवहार ठप्प, एन्ट्री शुल्क आकारणी थांबविण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
जयकिसान भाजीमार्केटमध्ये येणाऱ्या प्रत्येक वाहनाला एन्ट्री शुल्क आकारण्यास रविवारपासून प्रारंभ करण्यात आला. मात्र शेतकऱ्यांचे उत्पादन घेऊन येणाऱ्या वाहनधारकांना या शुल्काचा भुर्दंड बसणार आहे. पण नकळत हा भुर्दंड शेतकऱ्यांच्या माथी लादला जाण्याची शक्यता आहे. एन्ट्री शुल्क रद्द करावे, याकरिता भाजी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनी भाजीमार्केटसमोर वाहने लावून गेट बंद आंदोलन छेडले. त्यामुळे काहीवेळ भाजीमार्केटचा व्यवहार ठप्प झाला.
गांधीनगर येथे जय किसान होलसेल भाजी मार्केट असोसिएशनने स्व-मालकीचे भाजीमार्केट उभारले आहे. या भाजीमार्केटमधील कचऱ्याची उचल, स्वच्छता, पथदीपांची देखभाल आणि रस्त्यांची दुरुस्ती अशा विविध देखभालीसाठी निधी खर्च करावा लागत आहे. त्यामुळे संघटनेचे उत्पन्न वाढविण्याबरोबरच देखभालीचा खर्च व्यावसायिकांवर पडू नये याकरिता भाजीमार्केटमध्ये येणाऱ्या वाहनधारकांकडून शुल्क आकारणी करण्यास प्रारंभ करण्यात आले आहे. भाजी उतरविण्यासाठी किंवा भाजीपाला घेऊन जाण्यासाठी प्रत्येक वाहनचालकांकडून शुल्क आकारणी करण्याचा निर्णय भाजीमार्केट असोसिएशनने घेतला आहे. त्यानुसार निविदा काढून शुल्क आकारणीचे कंत्राट एका खासगी कंपनीला देण्यात आले आहे. तसेच नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासून शुल्क आकारणीस प्रारंभ करण्याची सूचना कंत्राटदाराला करण्यात आली होती. त्यानुसार सदर कंत्राटदाराने दि. 1 जानेवारीपासून प्रत्येक वाहनाकडून शुल्क आकारणीस प्रारंभ केला. लहान वाहनधारकांकडून 10 रुपये आणि मोठ्या वाहनांकडून 30 रुपये अशा पद्धतीने 10 ते 30 रुपये शुल्क आकारणी रविवारी सकाळपासून वसूल करण्यात आली.
मात्र वाहनचालकांनी एन्ट्री शुल्क देण्यास नकार दिला. शेतकऱ्यांचा भाजीपाला उतरविण्यासाठी येणाऱ्या वाहनधारकांकडून प्रत्येक वेळी ही रक्कम मोजावी लागणार आहे. त्यामुळे हा भुर्दंड शेतकऱ्यांनाच भरावा लागणार आहे. भाजी विक्रीवेळी विविध कराची आकारणी शेतकऱ्यांकडून केली जाते. तर आता पुन्हा एन्ट्री शुल्क भरावा लागणार आहे. हा शुल्काचा भार वाढल्यास शेतकऱ्यांच्या भाड्यामध्ये वाढ करण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी ही रक्कम न दिल्यास वाहनधारकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. प्रत्येक वाहन दिवसातून दोन ते तीन फेऱ्या मारते त्यामुळे प्रत्येकवेळी ही रक्कम भरावी लागणार आहे. त्यामुळे वाहनधारकांनी एन्ट्री शुल्क आकारणीला आक्षेप घेतला आहे. काही शेतकऱ्यांनी तसेच वाहनधारकांनी भाजीपाला अन्य भाजीमार्केटमध्ये घेऊन जाऊ, असा इशारा दिला.
रविवारी सकाळपासून एन्ट्री शुल्क आकारणीस प्रारंभ करण्यात आल्यानंतर वाहनधारकांनी शुल्क देण्यास नकार देऊन भाजीमार्केट गेटसमोर वाहने अडवी लावली. त्यामुळे काहीकाळ भाजी मार्केटमधील वाहतूक बंद झाली. परिणामी दोन तास भाजी मार्केटचे कामकाज ठप्प झाले. आपण हा शुल्क देणार नाही. भाजीमार्केट संघटनेने शुल्क आकारणी थांबवावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी व्यावसायिक आणि वाहनधारकांमध्ये चर्चा झाली. एन्ट्री शुल्क आकारणी तूर्त थांबविण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर भाजी मार्केटमधील व्यवहारास प्रारंभ झाला. पण एन्ट्री शुल्कच्या आकारणीमुळे भाजी मार्केटमधील व्यवहार दोन तास ठप्प झाला होता. भाजी मार्केटमधील व्यावसायिक सेस तसेच शेतकऱ्यांकडून कमिशन घेत असतात. तरीदेखील देखभालीचा खर्च एन्ट्री शुल्कच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह वाहनधारकांनी नाराजी व्यक्त केली.
तूर्त एन्ट्री शुल्क आकारणी थांबविली
भाजीमार्केटमध्ये जमा होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट संघटनेला करावी लागते. तसेच स्वच्छता, पथदीप देखभाल, भाजीमार्केटमधील रस्त्यांची दुरुस्ती आदी सर्व देखभालीचा खर्च संघटनेला करावा लागतो. त्यामुळे भाजीमार्केटमध्ये येणाऱ्या प्रत्येक वाहनांकडून एन्ट्री शुल्क आकारणी करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. त्यानुसार निविदा काढून हे कंत्राट देण्यात आले होते. त्यानुसार याची अंमलबजावणी रविवार दि. 1 पासून करण्यात आली. पण वाहनधारकांच्या तक्रारीनंतर तूर्त एन्ट्री शुल्क आकारणी थांबविण्यात आल्याचे जय किसान भाजीमार्केटचे अध्यक्ष दिवाकर पाटील यांनी सांगितले.
– दिवाकर पाटील, अध्यक्ष जय किसान भाजीमार्केट असोसिएशन