वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गेल्या नऊ वर्षांत निर्णायक धोरणे, राजकीय स्थैर्य, लोकशाही आणि संघराज्य रचनेत सामूहिक कार्याची भावना दिसून आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील स्थिर सरकारमुळे देशाला “पॉलिसी पॅरालिसिस”मधून बाहेर काढले असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी केले. दिल्लीतील विज्ञान भवनात आयोजित ‘चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’च्या 118 व्या वार्षिक अधिवेशनात ते बोलत होते.
2004 ते 2014 हा कालावधी हा राजकीय अस्थिरतेचा ‘शेवटचा काळ’ होता. तर 2014 ते 2023 ह्या गेल्या नऊ वर्षांच्या कामाचे परिणाम पाहिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या अर्थव्यवस्थेलाही नवी दिशा मिळाली असल्याचे अमित शहा म्हणाले. आता देशालाच नव्हे तर जगालाही पंतप्रधान मोदींचे नेतृत्व पहायचे आहे, असेही ते त्यांनी पुढे सांगितले. सद्यस्थितीत जी-20, चांद्रयान-3 मिशन, आदित्य एल-1 मिशनचे यश आणि महिला आरक्षण विधेयक मंजूर होणे यासारख्या घटनांनी देशात नवीन ऊर्जा भरल्याचेही त्यांनी नमूद केले.
देशाने 75 वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे. गेल्या 75 वर्षात आपण प्रत्येक क्षेत्रात अनेक यश संपादन केले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आम्ही स्वत:ला सिद्ध केले आहे. सुऊवातीला मेक इन इंडिया कार्यक्रमाची खिल्ली उडवली गेली. पण आज उत्पादन क्षेत्रात आपण मोठी प्रगती साधलेली आहे, असेही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले.