पुणे / प्रतिनिधी :
महाविकास आघाडी सरकारच्या मॉल तसेच दुकानात वाईन विक्री करण्याच्या निर्णयाबाबत लोकांच्या हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्यासमोर त्या सादर करण्यात येतील आणि मगच मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल, असे राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी येथे स्पष्ट केले.
पुण्यात माध्यमांशी ते बोलत होते. देसाई म्हणाले, याबाबत लोकांच्या हरकती मागवण्यात आल्या आहेत. जुलैमध्ये त्या आमच्याकडे आल्या आहेत. मागच्या दोन महिन्यांतील राजकीय गडबडीमुळे मंत्री म्हणून मला काम पाहता आलेले नाही. या निर्णयाच्या विरोधात किती बाजूने आणि स्थिर किती लोक आहेत, याबाबत माहिती घेण्यात येणार आहे. तसेच ग्रामीण आणि शहरी लोकांचे काय म्हणणे आहे ? हेदेखील पाहण्यात येणार आहे आणि मग मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्यासमोर ते सादर करण्यात येईल आणि मगच मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल.
अधिक वाचा : उद्धव ठाकरे अस्वस्थ; त्यांनी आत्मपरीक्षण करावे
शिवसेनेच्या वतीने गटप्रमुख मेळावा घेण्यात आला. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या नावाची खुर्ची रिकामी ठेवण्यात आली होती. याबाबत मंत्री शंभुराज देसाई यांना विचारले असता ते म्हणाले, आत्ता ते नाही ना तिथे बसायला. ते सध्या दुसऱ्याच खुर्चीवर आतमध्ये बसले, आत्ता काय करायचे? सुरुवात आम्ही करत नाही, तेच करतात. आम्ही कधीही पहिले बोलत नाही. ते सुरुवातीला आरोप करत असतात. आजही आम्ही ठाकरे परिवाराला मान देतो. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे ते कुटुंब आहे, त्यांचा आम्ही मानसन्मान करतो, असेही त्यांनी सांगितले.