विटा प्रतिनिधी
खानापूर तालुका कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढली जावी, काँग्रेसचे नेते माजी मंत्री विश्वजित कदम यांनी या आघाडीचे नेतृत्त्व करावे, मात्र कोणत्याही परिस्थितीत जुनी मैत्री चालणार नाही, निवडणूक बिनविरोध करणे बाजार समिती विकासाच्या मुळावर येत आहे, महाविकास आघाडीतून कोणी बाहेर राहिल्यास त्याचे परिणाम राज्य पातळीवर उमटतील असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभूते आणि राष्ट्रवादीचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष अॅड. बाबासाहेब मुळीक यांनी दिला.
खानापूर तालुका कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची बैठक विट्यात पार पडली. त्यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभूते आणि राष्ट्रवादीचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष ॲड. बाबासाहेब मुळीक यांनी पत्रकार परिषद घेत भूमिक स्पष्ट केली. यावेळी राष्ट्रवादी विधानसभा क्षेत्राध्यक्ष सुशांत देवकर, तालुकाध्यक्ष किसन जानकर, उपाध्यक्ष सचिन शिंदे, अॅड. संदीप मुळीक, धनपाल माने, शिवसेना तालुका प्रमुख राज लोखंडे, दादासो भगत, संतोष जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी अॅड. मुळीक म्हणाले, खानापूर तालुका कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लागली आहे. या निवडणूकीत आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढण्याची भूमिका घेतली आहे. आमचे नेते जयंत पाटील आणि काँग्रेस नेते विश्वजित कदम यांच्यात चर्चा झाली आहे. ठाकरे शिवसेना नेत्यांशीही आमचे बोलणे झाले आहे. जिल्हा पातळीवर शांताराम कदम, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रमसिंह कदम यांच्याशी प्राथमिक बोलणी झाली आहे. उद्या जिल्ह्याचे नियोजन ठरवण्याच्या दृष्टीने संयुक्त बैठक होत आहे. यामध्ये महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाच्या प्रतिनिधींना बोलवले आहे. खानापूर बाजार समिती निवडणूकीचे नेतृत्त्व माजी मंत्री आमदार विश्वजित कदम यांनी करावे. ते सांगतील तेवढ्या जागा आणि पदाधिकारी निवडी करण्यासाठी आम्ही तयार आहोत, असे सांगत महाविकास आघाडीने एकत्रीत लढण्याचा राज्य पातळीवर झालेला निर्णय अंमलात यावा, अशी अपेक्षा अॅड. मुळीक यांनी व्यक्त केली.
महाविकास आघाडी सोडून कोणी लढण्याची भूमिका घेतल्यास त्याचे परिणाम राज्य पातळीवर उमटतील. कोणी अशी भूमिका घेतली तरी निवडणूक लढवण्यावर आम्ही ठाम आहोत. निवडणूक बिनविरोध करण्यामुळे आणि सेटलमेंटमुळे बाजार समितीचे नुकसान झाले आहे. बाजार समिती भ्रष्टाचाराचा अड्डा बनली आहे, अशी टिका अॅड. मुळीक यांनी केली आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभूते म्हणाले, राज्य पातळीवर महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढण्याचा निर्णय झाला आहे. आपला शत्रू कोण आहे, हे निश्चित आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजप आणि शिंदे गटाशी तडजोड होणार नाही. काँग्रेसच्या शांताराम कदम यांच्याशी बोलणे झाले आहे. ते आजच्या बैठकीला येणार होते. मात्र उद्या आम्ही पुन्हा एकत्रित जिल्हा निवडणूकीसाठी बसणार आहोत. त्यावेळी आम्ही सर्व अहवाल त्यांना सांगणार आहोत. स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांना आम्ही बैठकीसाठी निमंत्रण दिले होते. मात्र ते आले नाहीत, असेही विभूते म्हणाले.