ऑनलाईन टीम / तरुण भारत :
अहमदनगरच्या चौंडी येथे मागील 21 दिवसांपासून सुरू असलेलं धनगर समाजाचं उपोषण आज मागे घेण्यात आलं आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या शिष्टाईला यश आले.
धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं, या मागणीसाठी सुरेश बंडगर आणि अण्णासाहेब रुपनवर यांचं मागील 21 दिवसांपासून उपोषण सुरू होतं. या उपोषणादरम्यान, सरकारकडून अनेकदा चर्चेचे प्रयत्न झाले. मात्र, या चर्चांमधून तोडगा निघत नव्हता. उपोषणकर्त्यांची या काळात प्रकृती देखील ढासळली. त्यांनी उपचार घेण्यासही नकार दिला होता. अखेर गिरीश महाजन यांनी याप्रकरणी दुसऱ्यांदा चौंडी येथे जावून त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. सुमारे दोन तास उपोषणकर्ते आणि फोनवरून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर चर्चा करून यातून तोडगा काढला. सरकारच्या लेखी आश्वासनानंतर अखेर 21 दिवसांनंतर यशवंत सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपलं उपोषण सोडलं.