बेवारस कुत्र्यांचा प्रश्न गंभीर : मनपा प्रशासन अपयशी, नागरिक भीतीच्या छायेखाली
बेळगाव : मागील आठवड्यात किणये येथील युवकाचा संसर्गजन्य कुत्र्याच्या संपर्कात येऊन रेबीजमुळे जीव गेल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी पुन्हा शहरात कुत्र्याने चौदा जणांवर हल्ला केला आहे. त्यामुळे शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न चिंताजनक बनू लागला आहे. शिवाय कुत्रा चावण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने शहरवासियांमध्ये भीती निर्माण होऊ लागली आहे. आता तरी प्रशासन, मनपा आणि पशुसंगोपन खाते गांभीर्याने घेणार का? हेच पहावे लागणार आहे. शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे लहान मुले आणि नागरिकांवर कुत्र्यांचे हल्ले वाढताना दिसत आहेत. अमननगर, उज्ज्वलनगर परिसरात 14 जणांचा कुत्र्याने चावा घेतला. त्यामुळे आता भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मनपा प्रशासनामार्फत केवळ तात्पुरती नसबंदी मोहीम राबविली जाते. त्यानंतर भटक्या कुत्र्यांचे कळप कायम पहायला मिळतात. हॉटेल आणि टाकाऊ पदार्थांमुळे शहरात भटक्या कुत्र्यांची पैदास वाढू लागली आहे. त्यामुळे दरवर्षी हजारो नवीन कुत्र्यांची भर पडू लागली आहे. त्यामुळे कुत्र्यांचे हल्ले वाढू लागले आहेत. यातून रेबीजसारख्या जीवघेण्या रोगाची लागण होऊ लागली आहे. त्यामुळे विनाकारण अनेकांना जीव गमवावा लागत आहे.
पशुसंगोपन खात्याच्या नोंदीनुसार जिल्ह्यात 77 हजार पाळीव कुत्र्यांची संख्या आहे. त्याबरोबर भटक्या कुत्र्यांची संख्याही अधिक आहे. यापैकी पाळीव कुत्र्यांना पशुसंगोपन खात्यामार्फत मोफत अँटीरेबीज लसीकरण केले जाते. मात्र, भटक्या कुत्र्यांकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे रेबीजचा धोका भटक्या कुत्र्यांपासून वाढू लागला आहे. मनपाच्या श्रीनगर येथील केंद्रामध्ये शस्त्रक्रिया करण्याची सुविधा उपलब्ध आहे. एका कुत्र्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च देखील केला जातो. मात्र, ही मोहीम केवळ तात्पुरती राबविली जाते. मात्र, त्यानंतर शहरात भटक्या कुत्र्यांचे कळप पुन्हा वावरताना दिसून येतात. त्यामुळे शहरातील भटक्या आणि बेवारस कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा पुन्हा ऐरणीवर येत आहे. पशु संगोपन खात्यामार्फत दरवर्षी सप्टेंबर महिन्यात पंधरवडा साजरा करून यामध्ये मोफत अँटीरेबीज लसीकरण मोहीम राबविली जाते. एकही कुत्रा लसीकरणापासून वंचित रहाणार नाही, याची खबरदारी घेतली जाते. मात्र, भटकी कुत्री या लसीकरणापासून वंचित राहतात आणि अशा कुत्र्यांकडून हल्ला झाल्यास धोका निर्माण होऊ लागला आहे.
कुत्र्यांना वेसण कोण घालणार?
शहरात कुत्र्यांकडून मानवावर हल्ले आणि चावा घेण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. त्यामुळे बेवारस कुत्र्यांना वेसण कोण घालणार? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. शिवाय भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी पुढाकार कोणी घ्यायचा? हाही प्रश्न कायम आहे. शहरात वाढणाऱ्या भटक्या कुत्र्यांची संख्या आणि त्यांचे हल्ले शहरवासियांसाठी चिंतेचा विषय बनला आहे.
या परिसरात बेवारस कुत्र्यांचे कळप
शहरातील बसस्थानक, महांतेशनगर, नेहरूनगर, उज्ज्वलनगर, सदाशिवनगर, शहापूर, गोंधळी गल्ली, समादेवी गल्ली, रेल्वेस्थानक, यंदे खूट आदी ठिकाणी कुत्र्यांचे कळप वाढले आहेत. तसेच दैनंदिन वाहतुकीबरोबर आता मानवासाठी या कुत्र्यांचा नाहक त्रास सुरू झाला आहे.
भटकी कुत्री लसीकरणापासून वंचित
पशुसंगोपन खात्यामार्फत रेबीज प्रतिबंधक लसीकरण कुत्र्यांना दिले जाते. मात्र, काही श्वानपालक याकडे दुर्लक्ष करतात. शिवाय भटकी कुत्री या लसीकरणापासून वंचित राहतात. समाजसेवक, श्वानप्रेमी आणि मनपा प्रशासनाने भटक्या कुत्र्यांना दवाखान्यात आणल्यास त्यांनाही प्रतिबंधक लस दिली जाते.
– डॉ. राजीव कुलेर (सहसंचालक पशुसंगोपन खाते)