सोमवारी सकाळपर्यंत प्रार्थनास्थळांवरील भोंगे हटविण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांची मागणी
प्रतिनिधी/ बेंगळूर
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार प्रार्थनास्थळांवरील भोंगे हटविण्यासाठी कर्नाटकातील हिंदुत्ववादी संघटनांनी सोमवार सकाळपर्यंत मुदत देत आक्रमक भूमिका घेतली आहे. जर भोंगे न हटविल्यास विशिष्ट प्रार्थनास्थळांजवळील मंदिरांमध्ये ध्वनिक्षेपक लावून मंत्रपठण करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे राज्य सरकारची कोंडी झाली आहे. हिजाब, हलाल, यात्रांमध्ये मुस्लिम व्यापाऱयांवर कथित निर्बंधानंतर आता राज्यात प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांचा मुद्दा पुन्हा उफाळून आला आहे.
मशिदींमध्ये ध्वनीक्षेपकाद्वारे होणाऱया अजानाच्या विरोधात सोमवारी सकाळी 5 वाजता मंदिरे आणि मठांमध्ये भजन, हनुमान चालीसासह मंत्रपठण करून आंदोलनाला चालना देण्याचा पुढाकार श्रीराम सेनेने घेतला आहे. अजान आणि हनुमान चालीसा वादामुळे आणखी एका धार्मिक संघर्षाचा धोका निर्माण झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर काही संघटनांकडून भोंग्यांवर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.
श्रीराम सेनेचे कार्यकर्ते राज्यातील धार्मिक स्थळांना भेट देऊन आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मशिदींवरील भोंगे उतरविण्यासाठी सोमवारपर्यंत मुदत दिलेल्या हिंदू संघटनांनी भोंगे हटविण्यात न आल्याने आता मंदिरांमध्येही तीनवेळा मंत्रपठण करण्यासाठी तयारी चालविली आहे.
पहाटे 5 वाजता, दुपारी 1 आणि सायंकाळी 5 वाजता होणाऱया अजानाच्या बदलात मंदिरात मंत्रपठण, हनुमान चालीसा, भजन करण्यात येणार आहे. त्यानुसार मशिदींशेजारी असणाऱया मंदिरात ध्वनीक्षेपकाद्वारे मंत्रपठण करण्यासाठी मंदिरांच्या व्यवस्थापक समितीचे मनपरिवर्तन करण्याचा कार्य हिंदू संघटनांकडून होत आहे. सोमवारपासून काही मंदिरांमध्ये तीनवेळा ध्वनिक्षेपकाद्वारे मंत्रपठण होणार आहे.
महाराष्ट्रातील वाद
प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांचा मुद्दा अलिकडच्या काळात महाराष्ट्रात निर्माण झाला होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांमुळे प्रदूषण होण्यासह सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होत असल्याचे म्हणत त्यांनी याविरोधात कारवाईची मागणी केली होती. तसेच कारवाई न झाल्यास मनसे स्टाइलने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. महाराष्ट्रात या आंदोलनाला काही प्रमाणात यश मिळाले असून विना अनुमती असलेले लाउडस्पीकर हटविण्यात आले आहेत. तसेच उत्तरप्रदेशात 1 लाखाहून अधिक लाउडस्पीकर खाली उतरविण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.