ऑनलाईन टीम/तरुण भारत
सध्या देशात ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. चित्रपटावर होत असलेले आरोप आणि प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापले. ‘काश्मीर फाइल्स’ (the kashmir files) या चित्रपटाचा आधार घेऊन भाजप देशभरामध्ये दिशाभूल करणारा प्रचार आणि गैरसमज पसरवत आहे. दरम्यान, अरविंद केजरीवालांनी (arvind kejriwal) the kashmir files चित्रपटावरून टीका केल्यांनतर आता शरद पवारांनीही (sharad pawar) या चित्रपटावर भाष्य केलं आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी शरद पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर दिल आहे.
दरम्यान , शरद पवारांनी दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्य विभागाच्या कार्यक्रमात the kashmir files चित्रपटाच्या माध्यमातून देशात विषारी वातावरण निर्माण करत असल्याचा गंभीर आरोप शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला होता. तसेच या चित्रपटाच्या प्रदर्शनालाही परवानगी देण्याची गरज नव्हती असं पवारांनी म्हटलं आहे. यावर काश्मिर फाईल्स चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी ट्वीटच्या माध्यमातून शरद पवार यांना उत्तर दिले आहे.
“मी काही दिवसांपूर्वीच फ्लाइटमध्ये शरदजी पवार आणि त्यांच्या पत्नीची भेट घेतली, त्यांच्या पायही पडले. यावेळी दोघांनी माझे आणि पल्लवी जोशी यांचे चित्रपटाबद्दल अभिनंदन केले आणि आम्हाला आशीर्वाद दिले. पण मीडियासमोर आता त्यांना काय झालं माहीत नाही. त्यांचा ढोंगीपणा उघड झाला असला तरीही मी त्यांचा आदर करतो,” असं विवेक अग्निहोत्री यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले शरद पवार –
“काश्मीर फाइल्स चित्रपटाच्या माध्यमातून भाजपा धार्मिक तेढ निर्माण करत आहे. तसेच या चित्रपटाच्या प्रदर्शनालाही परवानगी देण्याची गरज नव्हती. भाजपने देशातील सामाजिक सलोखा राखण्याचा प्रयत्न न करता हा चित्रपट करमुक्त करून भाजपाचे नेते लोकांना तो बघण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत,” अशी टीका पवार यांनी केली. शरद पवार म्हणाले,”मोदी सरकारला खरोखरच काश्मिरी पंडितांची काळजी असती तर केंद्राने त्यांचे पुनर्वसन केले असते. पण, हे सरकार मुस्लिमांविरोधात लोकांच्या भावना भडकवण्याचे काम करत आहे”.
काश्मिरी पंडित आणि मुस्लिमांवरील हल्ल्यांमागे पाकिस्तानातील दहशतवादी संघटना जबाबदार होत्या, असे सांगत पवार म्हणाले की, “काश्मीर प्रश्नाला सातत्याने पंडित नेहरूंना जबाबदार धरणे योग्य नाही. काश्मिरी पंडित खोऱ्यांतून बाहेर पडले तेव्हा केंद्रात व्ही. पी. सिंग यांचे सरकार होते. या सरकारला भाजपाने पाठिंबा दिला होता. मुफ्ती महम्मद सईद हे केंद्रीय गृहमंत्री होते, जगमोहन राज्यपाल होते. याच जगमोहन यांनी भाजपाच्या तिकिटावर दिल्लीत लोकसभेची निवडणूक लढवली होती”.