शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यातील वाद इतके टोकाला गेले की दोघांनी एकमेकांना आव्हान देताना जी भाषा केली ती पाहता राजकारणाचा पोत आता बिघडत चालला असून, केवळ वरिष्ठांच्या नजरेत येण्यासाठी वैचारिक टीका करण्यापेक्षा अत्यंत खालच्या पातळीवर टीका करण्याची जणू स्पर्धाच गेल्या काहीं महिन्यापासून लागली आहे. महाराष्ट्रासारख्या सुसंस्कत राज्यात राजकारणी मंडळींनी जे संकेत नियम, प्रथा, परंपरा पाळल्या होत्या त्यांनाच आता कुठे तरी हरताळ फासला जात असून राजकीय पक्षांनी याबाबत काही निर्बंध आणण्याची गरज आहे. थंडीत पारा घसरतो, शेअरबाजार घसरतो त्याप्रमाणे सध्या महाराष्ट्रातील राजकारणाची पातळी घसरली.
15 ते 20 वर्षापूर्वी महाराष्ट्रातील राजकारणात एखादी चुकीची घटना घडली तर लगेच विरोधकांकडून किंवा सत्ताधारी पक्षाकडून महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश, बिहार होऊ देऊ नका किंवा महाराष्ट्राची वाटचाल ही बिहारच्या दिशेने असे वक्तव्य केले जात असे. आमदारांची पळवापळवी, सरकार अल्पमतात आणण्यासाठी काहीही करणे, ज्येष्ठ नेत्यांबद्दल अनादर व्यक्त करणे किंवा त्यांचा अपमान करणे अशा बाहुबली स्टाईल घटना बिहार, उत्तरप्रदेशमध्ये नेहमीच्या होत्या. मात्र महाराष्ट्र हा त्या काळीही सुसंस्कृत राजकारणासाठी ओळखला जात होता.
विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना जून 2002 मध्ये देशमुखांचे सरकार पाडण्यासाठी शिवसेनेने त्यावेळी काँग्रेस आमदारांना फोडले होते. मात्र ज्या ठिकाणी या आमदारांना ठेवण्यात आले होते, तेथे असलेल्या शिवसैनिकांच्या गराडय़ातून काँग्रेस आमदार पद्माकर वळवी हे निसटले होते आणि त्यावेळी महाराष्ट्राचा बिहार झाल्याचा इतका आरोप करण्यात आला होता की, त्या एका घटनेने महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले होते. महाराष्ट्राच्या 60 वर्षाच्या राजकारणात केवळ निवडणूकांच्या प्रचारांच्या वेळी आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी उडत असत, पण त्यातही एक मर्यादा होती वैचारिक टीका होती, कमरेखालची भाषा कधी वापरली गेली नाही. मात्र गेल्या काही महिन्यातील महाराष्ट्राचे राजकारण बघता खालच्या पातळीवर वैयक्तिक टीका होऊ लागली आहे. एकमेकांची मापे अशा पध्दतीने काढली जात आहेत की लोकांसमोर राजकारण्यांची दुसरी बाजुच येऊ लागली आहे.
राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी महिला खासदार सुप्रिया सुळेंबाबत केलेले वक्तव्य असो, गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्या मुलाच्या आत्महत्येबाबत उपस्थित केलेली शंका असो किंवा एकमेकांवर आरोप करताना शारीरिक व्यंगावरुन टीका असो इतकेच नव्हे तर एका आमदाराने तर आदित्य ठाकरे हे ठाकरे घराण्याचे वंशज आहेत का? त्यांचा डीएनए तपासण्याची गरज असल्याचे वक्तव्य केले होते, आता आपला विरोधक कोण आपण टीका करताना कोणावर शंका घेतो म्हणजे गल्लीत ज्या पद्धतीने भांडणे होतात आणि एकमेकांच्या कुटुंबाचा जसा उद्धार केला जातो तसंच काहीसं राजकारणात बघायला मिळत आहे.
आरोप करायचा तर त्या वक्तीच्या पक्षावर करा, त्या नेत्याच्या कार्यपध्दतीवर करा, रोज सकाळी उठायचे काही ना काही बोंबलायचं, काहीतरी वाद निर्माण होईल असे व्ट्टि करायचे आणि सवंग प्रसिध्दी मिळवायची आणि वरिष्ठांच्या नजरेत कसे येऊ यासाठी खटाटोप करायचा हे आता काही नेत्यांचा नित्यक्रम झाला आहे. महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकीय नेत्यांची परंपरा आहे. शरद पवार, वसंतदादा पाटील, बाळासाहेब भारदे, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, आर.आर.पाटील, वि.स.पागे, जयंतराव टिळक ते प्रमोद महाजनांपासून पृथ्वीराज चव्हाणांपर्यंत मात्र आता राजकारणाचा स्तर घसरत चालला. खुन्नस आणि सुडाच्या राजकारणाचा एक नवीन पायंडाच जणू आता राजकारणात पडू लागला आहे. राजकारण इतक्या वैयक्तिक पातळीवर घेतले जाऊ लागले की आमदार, नेत्यांमधले सौहार्दपूर्ण संबंध, खेळीमेळीचे वातावरण आता बघायलाच मिळत नाही. विरोधक आणि सत्ताधारी समोर आले रे आले, की घोषणा आणि नेत्यांच्या जयजयकाराच्या घोषणा सुरूच. पंधरा दिवसापूर्वी माणचे आमदार जयकुमार गोरे मुंबईहून त्यांच्या मतदारसंघात जाताना गाडीचा भिषण अपघात झाला, या अपघातानंतर गोरे यांना रूग्णालयात दाखल केल्यानंतर स्वतः शरद पवार यांनी रूग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. हे तेच आमदार गोरे ज्यांनी शरद पवार यांना 2019 ला माढा मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी सर्वात पहिला विरोध केला होता, मात्र ज्येष्ठ नेत्यांमध्ये अजूनही सुसंस्कृतपणा आहे.
तर मुंबई भाजपचे अध्यक्ष ऍड. आशिष शेलार यांच्या आईचे निधन झाल्यानंतर उध्दव ठाकरे त्यांच्या घराजवळ राहत असतानादेखील साधा सांत्वनपर फोन केला नसल्याची खंत त्यावेळी शेलार यांनी बोलून दाखवताना राजकारण राजकारणाच्या जागी असते मी माझ्या पक्षासाठी काम करत असल्याचे सांगितले होते. त्यामुळे सुसंस्कृत महाराष्ट्रातील राजकारणात सर्वच पक्षांनी आणि पक्षाच्या नेत्यांनी आरोप प्रत्यारोप करताना, राजकारण करताना काही मर्यादा, शालनसुचिता, काही संकेत, नियम यांचे पालन करण्याची गरज आहे.
शरद पवार, बाळासाहेब ठाकरेंच्या काळातही राजकारणात आरोप प्रत्यारोप टोकाचे होत होते. तेल लावलेला पैलवान, मैद्याचं पोतं, लखोबा, टी बाळू या राजकारणातील टोपण नावा व्यतिरीक्त कधी कोणावर वैयक्तिक टीका झाली नाही. टीका व्हायची मात्र ती नेत्याच्या कार्यपध्दतीवर त्याच्या निष्ठेवर मात्र आता पेंग्विन, टिल्लु, खोके, बोके, रेडे, घटनाबाह्य सरकार इतकेच काय परवा तर संजय राऊत यांनी शिंदे गट म्हणजे एक टोळी असून लवकरच त्यांचा इनकाऊंटर होईल असे वक्तव्य करताना आमदारांच्या गटाला थेट टोळीची उपमा दिली. केवळ सत्ता मिळविण्याच्या लालसेपोटी पातळी सोडायची यामुळे नुकसान हे महाराष्ट्राचे होणार हे मात्र नक्की. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी यावर आत्मचिंतन करण्याची गरज आहे अन्यथा 30 वर्षापूर्वीचा बिहार होण्यास महाराष्ट्राला वेळ लागणार नाही.
प्रवीण काळे