ऑनलाईन टीम / तरुण भारत :
महाविकास आघाडी सरकारच्या काळात विधानपरिषदेवर नियुक्त करण्यासाठी दिलेली 12 जणांची यादी अखेर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रद्द केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ही यादी रद्द करण्याची शिफारस राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे केली होती. ही यादी रद्द झाल्याने विधानपरिषदेवर नवीन 12 सदस्य नियुक्त करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच शिंदे-फडणवीस सरकार नवीन यादी राज्यपालांकडे पाठविणार असल्याचे सांगण्यात येते.
महाविकास आघाडी सरकारने 12 नोव्हेंबर 2020 ला विधानपरिषदेवर नियुक्त करण्यासाठी 12 जणांची यादी राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे पाठवली होती. त्यामध्ये राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे आणि आनंद शिंदे तर काँग्रेसकडून रजनी पाटील, सचिन सावंत, मुझफ्फर हुसैन आणि अनिरुद्ध वनकर यांची नावं होती. शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर, चंद्रकांत रघुवंशी, विजय करंजकर आणि नितीन बानगुडे पाटील यांची नावे होती. मात्र, कोश्यारी यांनी यावर दोन वर्ष कोणताही निर्णय घेतला नव्हता. यावरून महाविकास आघाडी आणि राज्यपालांमध्ये वादही समोर आले होते. मधल्या काळात यापैकी एकनाथ खडसे यांची विधानपरिषेदत एन्ट्री झाली तर काँग्रेसच्या रजनी पाटील यांनी राज्यसभेची लॉटरी लागली.
अधिक वाचा : वादळी पाऊस पुढील काही दिवस कायम राहणार
दरम्यान, राज्यातील सत्तासंघर्षानंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलं. त्यानंतर आठडाभरापूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी मविआ सरकारच्या काळातील राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी दिलेली यादी रद्द करण्याची मागणी कोश्यारींकडे केली होती होती. ही यादी अखेर राज्यपालांनी रद्द केली आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारकडून राज्यपाल नियुक्त 12 नावं लवकरच राज्यपालांकडे पाठवली जाणार आहेत. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 19 डिसेंबरपासून नागपुरात सुरू होणार आहे. या अधिवेशनापूर्वी या 12 जागा भरल्या जातील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.