मुख्यमंत्री-नेते नाराज : निवृत्त एडीजीपी भास्करराव यांची टीका
बेळगाव : काँग्रेस सरकारच्या पाचही गॅरंटी योजना निष्फळ ठरल्या आहेत. शक्ती, गृहज्योती, विद्यानिधी योजनांपासून नागरिकांना वंचित रहावे लागले आहे. सरकारने घोषणा केली असली तरी खालच्या स्तरावर या योजना पोहोचल्या नाहीत. विविध जिल्ह्यांमध्ये पाहणी केल्यानंतर सत्य परिस्थिती भयावह आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीदेखील निराश आहेत, असा आरोप निवृत्त एडीजीपी भास्करराव यांनी केला आहे. सरकारला बहुमत मिळूनदेखील सरकार डळमळीत झाले आहे. राज्यासमोर ज्वलंत समस्या निर्माण झाल्या आहेत. मात्र सरकारला त्या सोडविण्यात अपयश आले आहे. राज्यपातळीवर घोषणा झाल्या असल्या तरी ग्राम पंचायत स्तरावर त्या अंमलात आल्या नाहीत. गृहलक्ष्मी आणि गृहज्योती योजना नागरिकांपर्यंत पोहोचल्या नाहीत. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. एकूणच काँग्रेस नेते अपयशी ठरले आहेत, असा आरोपही त्यांनी केला. तुमकूर, दावणगेरी आणि इतर जिल्ह्यातील शेतकरी आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. त्यामुळे शेतकरी आणि विद्यार्थ्यांसमोर बऱ्याच समस्या निर्माण झाल्या आहेत. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत आला आहे. तर शिष्यवृत्ती ठप्प झाल्यामुळे विद्यार्थ्यांसमोर आर्थिक चणचण निर्माण झाली आहे. या सर्व समस्या सोडविण्यात सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे सर्व नेते मंडळी नाराज झाली आहेत, अशी खोचक टीकाही त्यांनी केली. यावेळी अॅड. एम. बी. जिरली, शरद पाटील उपस्थित होते.