महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांचे गौरवोद्गार : मुंबई येथील लोकमान्य आयोजित ‘स्वातंत्र्याची चित्रगाथा’ प्रदर्शनाला भेट
प्रतिनिधी / मुंबई
स्वातंत्र्यलढय़ातील लोकमान्य टिळक सर्वांना माहीत आहेत. त्यांचे देशप्रेम आणि त्याग अतुलनीय आहे. म्हणूनच लोकमान्य यांच्या नावानेच किरण ठाकुर यांनी ‘लोकमान्य’ची स्थापना केली. ही संस्था अडलेल्यांची गरज पूर्ण करते. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर यांच्या संकल्पना कल्पक असतात. यात सतत नावीन्य असते. त्यांच्या कार्यात नेहमीच वेगळे घडवायचे दंडक राहिले आहे. म्हणूनच गरजू कुटुंबीयांच्या मागे उभे राहण्याचे काम किरण ठाकुर यांच्या ‘तरुण भारत’ने वारंवार केले आहे, असे गौरवोद्गार महाराष्ट्राचे पॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांनी काढले.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्री केसरकर यांनी गुरुवारी आपल्या सहकाऱयांसह शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन आशीर्वाद घेतले. यानंतर लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी आयोजित ‘स्वातंत्र्याची चित्रगाथा’ प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी ते बोलत होते.
केसरकर म्हणाले, ज्यांच्यामुळे आपण स्वतंत्र झालो, अशा अज्ञात स्वातंत्र्यवीरांचे हे चित्रप्रदर्शन पाहणे म्हणजे त्या स्वातंत्र्यवीरांना मानवंदनाच आहे. अशा चित्रगाथेच्या संकल्पनेप्रमाणेच किरण ठाकुर यांच्या कोणत्याही ऐतिहासिक प्रदर्शनाला आणि समाजविधायक कार्याला मदत करण्याची प्रथा या समुहाकडे आहे. ‘तरुण भारत’ समुहाचे समर्पण सीमालढय़ासाठी अतुलनीय आहे. किरण ठाकुर यांचे वडील बाबुराव ठाकुर यांच्यापासून हे समर्पण सुरू झाले. हा लढा 50 वर्षांपासून सुरू राहणे हेच या लढय़ाचे यश असल्याचे त्यांनी सांगितले.
केसरकर पुढे म्हणाले, ठाकुर कुटुंबीयांसोबत मराठी मने जोडली गेली आहेत. एखाद्या मराठी मनाचा सन्मान होतो, त्यावेळी तो ठाकुर कुटुंबीयांचा असतो. केसरकर कुटुंबीयांचे ठाकुर कुटुंबीयांशी दुहेरी नाते असल्याचे त्यांनी सांगितले. बेळगावची कीर्ती देशभर पसरविण्याचे काम ठाकुर कुटुंबीयांनी ‘लोकमान्य’च्या रुपातून केले. देशभरात लोकमान्य सोसायटीची घोडदौड सुरू आहे. गरजूंची काळजी घेतल्यानेच ‘लोकमान्य’चा पसारा देशभर असल्याचे केसरकर म्हणाले.
यावेळी लोकमान्यचे रिजनल मॅनेजर रमेश शिरसाट, सिनियर मॅनेजर अतुल परब, राजू नाईक, उज्ज्वला देसूरकर आदी उपस्थित होते. ऑगस्ट 13 ते 15 या कालावधीत ठाणे, मुलूंड, पनवेल येथेही चित्रगाथा भरविण्यात येणार आहे, अशी माहिती लोकमान्य सोसायटीकडून देण्यात आली.
स्वातंत्र्याची चित्रगाथा विद्यार्थ्यांसाठी ठरली प्रेरणादायी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी मुहूर्तावर लोकमान्य सोसायटी आयोजित ‘स्वातंत्र्याची चित्रगाथा’ प्रदर्शनाला 9 ऑगस्ट क्रांती दिनापासून पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे सुरुवात झाली. यावेळी हजारो इतिहासप्रेमी नागरिकांनी प्रदर्शनाला भेट दिली. यात विद्यार्थ्यांचा उत्साही सहभाग दिसून आला. गुरुवारी धारावी येथील छत्रपती शिवाजी विद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षकवृंदाने भेट दिली. यावेळी ‘भारत माता की जय’ अशा विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या.