ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांचे प्रतिपादन : माधवराव गडकरी यांचा पणजीत जयंती कार्यक्रम
प्रतिनिधी /पणजी
लोकशाहीत सत्ताधारी पक्षाला सुईच्या टोकावर ठेवणारा विरोधी पक्ष असेल तरच सरकारचे कार्य चांगले चालू शकते अशी धारणा बाळगणारे माधवराव गडकरी हे धगधगत्या उत्साहाचे मूर्तीमंत उदाहरण होते, असे गौरवोद्गार ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी काढले. मात्र आजची पत्रकारिता अशा वळणावर पोहोचली आहे की, आपण कुणासाठी पत्रकारिता करतोय याचे सिंहावलोकन, आत्मपरीक्षण होण्याची गरज निर्माण झाली आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
झुंजार पत्रकार माधव गडकरी यांच्या 94 व्या जयंतीनिमित्त पणजीत मिनेझिस ब्रागांझा सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. राज्यातील मराठी पत्रकारांच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
देशात अनेक प्रतिभावान संपादक होऊन गेले परंतु गडकरी हे दिशा दाखवणारे, हिंमत देणारे, लोकचळवळीत वावरणारे, लोकांमधील संपादक होते. संपादकांना दृष्टिकोन लागतो त्यात गडकरी माहीर होते. देशात असे मोजकेच संपादक होऊन गेले, ज्यांचे लेखन वाचण्यासाठी लोक वर्तमानपत्रे विकत घेत असत, त्यामध्ये गडकरी हे एक होते. चौफेर वाचन आणि चौफेर विचारांमधून होणारे त्यांचे चौफेर लेखन, त्यांचे अग्रलेख वाचण्यासाठी वाचकांच्या उडय़ा पडायच्या, असे पुढे बोलताना भावे यांनी सांगितले.
गडकरी यांनी अनेक पत्रकार घडविले. अनेकांना संधी दिली. अनेकांना लिहिते केले. त्याचबरोबर वर्तमानपत्रात सतत वेगवेगळे प्रयोग केले. त्यात ते प्रचंड यशस्वी ठरले. ज्या वर्तमानपत्रास दुपार झाली तरी लोक हात सुद्धा लावत नव्हते, त्यांचे गडकरी यांनी सोने करून दाखवले. गडकरी हे उत्साहाचा झरा होते. म्हणुनच ते कधीच थकलेले, निराश, चिडलेले दिसले नाहीत. मात्र भ्रष्टाचारा विषयी त्यांना प्रचंड चीड होती, असे श्री. भावे पुढे म्हणाले.
अध्यक्षपदावरून बोलताना माजी केंद्रीय मंत्री ऍड. रमाकांत खलप यांनी आपल्या राजकीय पदार्पणाचे श्रेय काका पानकर व शशिकलाताई काकोडकर यांना दिले. परंतु आपण खरा घडलो तो मात्र माधवराव गडकरी यांच्यामुळेच, असे कृतज्ञभावाने नमूद केले.
माजी संपादक सुरेश वाळवे यांनी बोलताना गडकरी हे मूळ गोमंतकीय नसले तरी गोव्याच्या जीवनाशी समरस झालेले व्यक्तीमत्व होते. असा संपादक आपण पाहिला नाही, असे सांगितले. सिद्धहस्त पत्रकार असलेले गडकरी जनमत कौलावेळी असते तर मोठा फरक पडला असता. सर्वसामान्य लोकांना माहीत नसलेल्या अनेक गोष्टींवर ते सतत उजेड टाकत. पत्रादेवी येथे हुतात्मा स्मारक बांधण्यात आले तेव्हा त्यावर हुतात्म्यांची नावेच लिहीली नव्हती. गडकरी यांनी ते हेरून चळवळ सुरू केली. त्याची दखल घेत सरकारला तेथे हुतात्म्यांच्या नावाची पाटी लावावी लागली, असे वाळवे पुढे म्हणाले.
संपादक राजू नायक यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास गडकरी यांच्या कन्या सौ. वर्षा आणि जावई प्रसाद प्रधान यांची खास उपस्थिती होती.
विरोधकांना संपविण्याचे घाणेरडे राजकारण
एका बाजूने आज सत्ताधाऱयांकडून विरोधी पक्ष संपविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर दुसऱया बाजूने स्वतःची तुलना महात्मा गांधीजींशी करणारे राजकारणीही दिसू लागले आहेत. हा लज्जास्पद प्रकार आहे. एवढे घाणेरडे राजकारण यापूर्वी कधीच झाले नव्हते. परंतु लोक सतर्क आहेत. अशा गोष्टींचा अतिरेक होईल तेव्हा लोक निश्चित निर्णय घेतील. शांत असलेला सर्वसामान्य माणूस उभा ठाकेल तेव्हा यांचा कडेलोट होईल. त्यासाठी सत्य लिहिणारे संपादक आणि सत्य शोधणाऱया पत्रकारांची देशाला गरज आहे, असे उद्वीग्न मत भावे यांनी व्यक्त केले.