मण्णूर येथे हुतात्मादिनासंदर्भात म. ए. समितीची जनजागृती बैठक
वार्ताहर /हिंडलगा
सीमाप्रश्नाचा लढा हा जनआंदोलनाचा लढा असून गेली 66 वर्षे सीमावासीय जनतेने सुरू केलेला एकमेव लढा आहे. मराठी माणूस आपल्या हक्काची आपल्या भाषेतून परिपत्रके मिळावीत, यासाठी प्रशासनाकडे आणि कर्नाटक शासनाकडे कित्येक वर्षांपासून मागणी करत असून कर्नाटक शासनाने त्याला अद्यापही प्रतिसाद दिलेला नाही. उलट मराठी माणसांवर जाणून-बुजून अन्याय करून खच्चीकरण करण्याचे काम कर्नाटक शासन करीत आहे. त्यामुळे आपल्या न्याय हक्कासाठी सीमालढा आणखी तीव्र करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते आर. एम. चौगुले यांनी केले.
मण्णूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील समुदाय भवनमध्ये आयोजित 1 जून हुतात्मादिन व मराठी परिपत्रकांसंदर्भात जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यासाठी जनजागृती सभेप्रसंगी ते व्यासपीठावरून बोलत होते. अध्यक्षस्थानी देवस्की पंच कमिटी अध्यक्ष मुकुंद तरळे
होते.
याप्रसंगी ते म्हणाले, सीमाभागातील मराठी जनतेला परिपत्रके आणि कागदपत्रे सरकारदरबारी मराठी भाषेतून मिळावीत, यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने आंदोलन पुकारून अनेकदा जिल्हाधिकाऱयांना निवेदने दिली आहेत. मात्र, सदर निवेदनांना प्रशासनाने केराची टोपली दाखविली आहे. प्रशासनाला याचा जाब विचारण्यासाठी आणि समज देण्यासाठी पुन्हा आम्ही महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने निवेदन देणार आहोत. तरी सर्व मराठी भाषिक व सीमावासीय जनतेने एकजुटीने दि. 1 जून रोजी हुतात्म्यांना अभिवादन करून जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही केले.
तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. व्यासपीठावर जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, प्रकाश मरगाळे, माजी आमदार मनोहर किणेकर, शहर समिती अध्यक्ष दीपक दळवी, माजी महापौर शिवाजी सुंठकर, मनोज पावशे, युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके, संतोष मंडलिक, ऍड. सुधीर चव्हाण यांच्यासह महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी दीपक दळवी, मनोहर किणेकर, सरस्वती पाटील, प्रकाश मरगाळे, शिवाजी सुंठकर, मनोज पावशे, शुभम शेळके, चेतन पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, देवस्की पंचकमिटी सदस्य, ग्रा.पं. सदस्य यांच्यासह मण्णूर, आंबेवाडी, गोजगा, हिंडलगा आदी गावांतील नागरिक, महिला व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.