वृत्तसंस्था/ जम्मू
माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद यांनी जम्मू-काश्मीरच्या भदरवाह येथे एका सभेला संबोधित करताना, स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याचे जाहीर केले. सदर पक्ष पूर्ण राज्याचा दर्जा पुनर्स्थापित करण्यावर लक्ष पेंद्रीत करेल. मी माझ्या पक्षाचे नाव अद्याप ठरवलेले नाही. जम्मू-काश्मीरचे लोक पक्षाचे नाव आणि झेंडा ठरवतील. मी माझ्या पक्षाला हिंदुस्थानी नाव देईन, जे सर्वांना समजेल, असे आझाद पुढे म्हणाले.
काँग्रेस सोडल्यानंतर जम्मूमधील आपल्या पहिल्या जाहीर सभेत बोलताना आझाद यांनी, जेव्हा काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्यावर क्षेपणास्त्रs डागली तेव्हा आपण केवळ रायफलने प्रत्युत्तर दिले आणि त्यात क्षेपणास्त्रे नष्ट झाली, असा टोला हाणला. आपण बॅलेस्टिक क्षेपणास्त्र वापरले असते, तर काय झाले असते. ते गायबच झाले असते, असेही आझाद पुढे म्हणाले.
माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी आणि स्व. राजीव गांधी यांच्यावर भाष्य करणे त्यांनी टाळले. ‘मी 52 वर्षे पक्षाचा सदस्य राहिलेलो असल्याने आणि राजीव गांधींना भाऊ, तर इंदिरा गांधींना माझी आई मानत असल्याने, मला त्यांच्या विरोधात एक शब्दही वापरण्याची इच्छा नाही’, असे ते म्हणाले.