सांकवाळच्या वारकऱयांचे मत
वार्ताहर /झुआरीनगर
मनात विश्वास व भक्ती असली की तो पांडुरंगच सर्व काही सोपे करून आपल्या भक्तांची इच्छा पूर्ण करतो. पंढरीच्या वारीचा हा भक्तीप्रवास अविस्मरणीय असाच होता व तो अनुभवयास एकदा तरी आयुष्यात पंढरीची वारी करावी असे मत पंढरीची वारी करून आलेल्या सांकवाळच्या शिला नाईक, संदीप नाईक तसेच रोहन नाईक यांनी मांडले.
मुळगावच्या वारकरी संस्थेबरोबर त्यांनी प्रथमच पायी वारी केली. यावेळी एकूण 2250 वारकरी होते. 26 जूनला डिचोली मुळगावहून वारीला प्रारंभ झाला. दोडामार्ग, भेडशी, चंदगड, निपाणी, कोल्हापूर, सांगली मार्गे ते 8 जुलैला पंढरपूरला पोहचले. चंद्रभागा नदीत स्नान करून श्री विठ्ठलाचे मुख दर्शन घेतले. श्री विठू माऊलीचे असंख्य भक्तगण आहेत. यावेळी ज्या ज्या गावातून प्रवास केला तेथील नागरिक वारकऱयांचे भक्तीभावाने स्वागत केले. वारकऱयासाठी चहा-पाणी व रात्री राहण्याचीही सोय त्यांनी केलेली असायची. वारकऱयासाठी असलेल्या त्यांच्या या प्रेमामुळे श्री पांडुरंगावर त्यांची खूप मोठी श्रद्धा आहे हे या वारीतून दिसून आल्याचे शिला नाईक यांनी सांगितले. या वारीमुळे साधेपणाने जगण्याचा अनुभव आला. विठू माऊलीच्या नामस्मरणात तेरा दिवस कसे गेले कळले नाही. वारीची ही आठवण आयुष्यभर स्मरणात राहील असे त्यांनी पुढे सांगितले.