दरामध्ये वाढ : पशुधन शेतकऱ्यांना चिंता : यंदा तालुक्याच्या सर्रास भागात सुक्या चाऱ्याची टंचाई : वळीव पावसाची प्रतीक्षा
वार्ताहर /किणये
तालुक्यातील बहुतांशी नागरिकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. या ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेत शेतीच्या बरोबरीनेच पशुधनाचा मोठा वाटा आहे. शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेतकरी दुग्ध व्यवसाय करतात. या जनावरांना ओल्या चाऱ्याबरोबरच सुकाचारा महत्त्वाचा आहे. मात्र सध्या सुक्या चाऱ्याचा दर वाढला असल्यामुळे पशुधन शेतकऱ्यांमध्ये च्ंिांतेचे वातावरण पसरले आहे. य् ांदा तालुक्याच्या सर्रास भागात सुक्या चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे जनावरांना सुकाचारा आणायचा कोठून, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे. सध्या तालुक्याच्या विविध ठिकाणी पाण्याची टंचाई तसेच शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होतो आहे. यातच आता अधिक भर झाली आहे ती म्हणजे जनावरांच्या सुक्या चाऱ्याची. यंदा म्हणावा तसा वळीव पाऊस झाला नाही. यामुळे माळरानावरील गवताला पालवी फुटली नाही. वळीव पाऊस झाला असल्यास जनावरांना चरण्यासाठी सोडले की, त्यांना ओला चारा मिळू शकतो. मात्र वळीव पाऊस झाला नाही. त्यामुळे विहिरी व कूपनलिका या पाण्यावरील मक्का व इतर ओल्या चाऱ्यावरच जनावरांचे पालन करण्यात येत आहे. तालुक्यात भात हे प्रमुख पीक घेतले जाते. भाताची कापणी मळणी झाल्यानंतर शिल्लक राहिलेले पिंजर जनावरांसाठी सुका चारा म्हणून वर्षभर उपयोगात आणतो. यंदा पिंजर सर्रास भागात कमी मिळाले असल्यामुळे याचा दर अधिक झाला आहे. सध्या काही भागात 7 ते 9 हजार एका ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला दर सुरू आहे. यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना सध्यातरी पिंजर विकत घेणे परवडणारे नाही. यामुळे सुक्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या गोठ्यात किमान तीन ते चार जनावरे आहेत. प्रत्येक जनावरांना दिवसाला किमान पाच ते सहा किलो सुका चारा व 12 ते 14 किलो ओला चारा लागतो, अशी माहिती काही जाणकर शेतकऱ्यांनी दिली आहे.
कृषी खात्यामार्फत योजना राबविणे गरजेचे
सध्या जनावरांसाठी सुका चारा म्हणून पिंजराचा अधिक प्रमाणात उपयोग केला जातो. शेतकरी मळणी झाल्यानंतर पेंजर आपल्या घराजवळील परसात किंवा आजुबाजूला आणून ठेवतात. वर्षभर पुरेल इतका हा साठा करण्यात येतो. यंदा मात्र पिंजर अधिक मिळाले नसल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या गवतगंजीत संपण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकरी सुक्या चाऱ्यासाठी धावपळ करताना दिसू लागले आहे. तालुक्यात शेतकऱ्यांना सुका चारा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी खात्यामार्फत योजना राबविणे गरजेचे आहे.
-सातेरी पावशे- जानेवाडी
दुग्ध व्यवसायावर कुटुंबीयांचा उदरनिर्वाह
सुका चारा कमी झाल्यामुळे जनावरांचे पालनपोषण कसे करायचे, याची चिंता आम्हाला लागून राहिली आहे. गोठ्यात गाई व म्हशी आहेत. दुग्ध व्यवसायावर आमच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालतो. ओल्या चाऱ्याबरोबरच सुका चाराही तितकाच महत्त्वाचा आहे. चाऱ्याची कमतरता भासत असल्यामुळे गाई व म्हशीचे दुधही कमी झाले आहे. सुक्या चाऱ्याचा दर वाढला असून पिंजर मिळणेही अवघड झाले आहे. आता सुका चारा आणायचा कोठून, असा प्रश्न आम्हा शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.
-पावणु सावंत -बाकनुर