पुढील 3 दिवसांत कोकणात पर्जन्यमान ओसरण्याचा हवामानचा अंदाज
प्रतिनिधी/ रत्नागिरी
परतीच्या प्रवासाकडे मार्गक्रमण करणारा पाऊस अंतिम टप्प्यात जोरदार बरसण्याची दाट शक्यता आहे. नुकतेच परतीच्या प्रवासातील मघा त्यानंतर पूर्वा ही पावसाची नक्षत्रे जोरदार बसरली. आता उत्तरा हे मेंढा वाहन असलेले नक्षत्र जोरदार बरसत आहे. हवामान विभागाने आज 18 सप्टेंबरपासून कोकणात पावसाचा जोर पुढील 3 दिवस ओरसण्याचा अंदाज वर्तवला आहे. पण यापुढे 27 सप्टेंबरपासून सुरू होणाऱया हस्त नक्षत्राच्या वाहन असलेल्या ‘हत्ती‘चा पाऊस बरसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पावसाच्या सुरूवातीपासूनच्या नक्षत्रातील आसळका नक्षत्रापर्यंतचा पाऊस हा पश्चिमेकडील वाऱयांमुळे होतो. तर अन्य नक्षत्रांचे पाऊस हे पूर्वेकडून येणाऱया वाऱयामुळे होतात. यालाच परतीचा पाऊस असेही संबोधले जाते. यामुळे हा पाऊस रब्बी हंगामासाठी उपयुक्त ठरतो. पश्चिम घाट परिसरात प्रामुख्याने अरबी समुद्रावरून म्हणजेच पश्चिम दिशेने येणाऱया ढगाद्वारे पाऊस पडतो. तर परतीचा पाऊस हा बंगालच्या उपसागरावरून येणाऱया वाऱयामुळे येतो. याशिवाय चित्रा व स्वाती या दोन नक्षत्रांचा पाऊस बेभरवशाचा असून त्याचा पिकांना उपयोग तर होतच नाही, मात्र नुकसानकारक ठरू शकतो. थंडीचा हंगाम याचवेळी सुरू होत असल्याने रब्बी पिकांना पोषक हवामान यावेळी तयार झालेले असते. पण सध्याचे वातावरण पाहता आसळकानंतर मघा, पूर्वा, ही पावसाची नक्षत्रे संपली, पण त्यामध्ये जोरदार पाऊस बरसला. त्यानंतर गेल्या 13 सप्टेंबरपासून पावसाचे उत्तरा नक्षत्र सुरू झाले असून हे नक्षत्र 26 सप्टेंबर रोजी संपणार आहे. पण या नक्षत्रात सध्या धुवाधार पर्जन्यमान होताना दिसत आहे. हवामान विभागाने आज 18 सप्टेंबरपासून कोकणात होत असलेले हे पर्जन्यमान ओसरण्यास सुरूवात होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. 21 सप्टेंबरपर्यंत कोकणासह रत्नागिरी जिल्हय़ात ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे. पण राज्यभरात अन्यत्र जोरदार ते अति जोरदार पर्जन्यमान होण्याचा अदाज वर्तवलेला आहे.