रशिया-युक्रेन युद्ध आणखी किती काळ लांबणार याचे निश्चित असे उत्तर आज तरी कोणाकडेच नाही. एकूण जागतिक परिस्थितीकडे पाहता आणखी दोन महिन्यांनी या युद्धास दिड वर्ष होईल. तथापि, ते संपुष्टात आणण्याची क्षमता किंवा शक्यता दृष्टीपथात नाही. जणू हे युद्ध ‘रोज मरे त्याला कोण रडे’ या न्यायाने जगाच्या अंगवळणी पडत चालले आहे. ही उदासिनता, निष्क्रियता आणि थंडपणा हा तथाकथित आधुनिक जगास न शोभणारा, अमानुष असा आहे. हे युद्ध जसे लांबत चालले आहे तस तसे ते अनेक नवी वळणे घेताना दिसते आहे. प्रत्यक्ष युद्ध, आक्रमण, प्रदेश ताब्यात घेणे या पलीकडे त्याचे स्वरुप बदलत चालले आहे. अगदी काही दिवसांपूर्वी या युद्धा दरम्यान नोव्हा कारवोव्हका नावाचे एक मोठे धरण उध्वस्त करण्यात आले. युक्रेन लष्कर आणि नाटो देशांनी या प्रकरणी रशियास दोष दिला आहे. तर रशियाने युक्रेनवर ठपका ठेवला आहे. हे धरण खेरसन प्रांतात असून सध्या त्यावर रशियाचा कब्जा आहे. सदर धरण हे सोव्हिएत रशिया, देश म्हणून एकसंघ असताना आणि युक्रेन त्याचाच भाग असताना साम्यवादी राजवटीत बांधले गेले. निपर नदीवर बांधले गेलेले हे विस्तिर्ण धरण प्रादेशिक दृष्ट्या दक्षिणेकडचा भाग रशियाकडे तर उत्तरेकडील भाग युक्रेनकडे असे विभागले गेले होते. मूलत: पाणी पुरवठा शेती आणि आण्विक प्रकल्प व विद्युत निर्मितीसाठी कल्याणकारी हेतूने बांधलेले हे धरण आज त्याच्या उध्वस्तीकरणामुळे कर्दनकाळ बनले आहे.
युक्रेनच्या म्हणण्यानुसार धरण फुटल्यानंतर निर्माण झालेली पूर परिस्थिती, विस्थापन, प्राणहानी याची माहिती अद्याप गोळा करण्यात येत आहे. ती लवकरच प्रसारित होईल. परंतु हा महापूर हजारो लोकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवणारा, हजारो हेक्टर शेती नष्ट करुन दलदल निर्माण करणारा आणि किमान 1930 चौरस मैलाच्या प्रदेशास जलसिंचन सुविधेअभावी वाळवंटात रुपांतरीत करणारा ठरेल. दरम्यान जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनीधीने युक्रेनवर या आपत्तीमुळे ओढवलेल्या परिस्थितीची नोंद घेत सर्वतोपरी मदत करण्याची तयारी दर्शविली आहे. दुसरीकडे युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्कि यांनी जागतिक समुदायास दोष देताना महापुरानंतर तातडीने मदत न पुरवल्याचा आरोप केला आहे. पिण्याचे पाणी, अन्न आणि औषधे यांच्या अभावी आणखी कितीजण मरतील ते परमेश्वरासच ठाऊक, असे हताश उद्गार त्यांनी काढले आहेत.
तसे पाहता अगदी आरंभीच्या काळापासून पाणी आणि जलस्त्रोत हे माणसांसाठी जीवनदायी म्हणून अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. परंतु याच माणसाने युद्ध परिस्थितीत किंवा शत्रू समुहास धडा शिकवण्यास पाण्याचा, जलस्त्रोतांचा वापर केल्याची अनेक उदाहरणे इतिहासात विखुरली आहेत. सुमारे 1500 वर्षांपूर्वी जगप्रसिद्ध चित्रकार, शिल्पकार, तंत्रज्ञ लिओनार्दो दी व्हींचीने सहकारी निकोलो मॅकव्हीले यांच्यासह विसा शहर व फ्लोरेन्स संघर्षात पाणी अर्नो नदी वळवून पळविण्याचा प्रयत्न केला होता. सुदैवाने तो अपयशी ठरला. दुसऱ्या महायुद्धा दरम्यान बेल्जियन सैन्य आणि शेतकऱ्यांनी जर्मन सैन्याचे आक्रमण रोखण्यासाठी यसर नदीच्या काही भागात रणतीनीचा भाग म्हणून कृत्रिम पूर परिस्थिती निर्माण केली होती. दुसऱ्या महायुद्धात तर ब्रिटीशांनी धरण फोड (डॅम बस्टर) मोहिमच राबविली. ज्यात उसळी खाणाऱ्या बॉम्बसच्या आधारे धरणांना लक्ष्य केले गेले. ही मोहिम जर्मनीच्या विरोधात होती. मात्र केवळ दोन धरणांना हानी पोहचवण्यात ती यशस्वी ठरली. इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन यातील संघर्ष तर जुनाच आहे. या संघर्षात इस्त्रायलने पॅलेस्टाईन लोकांना विस्थापित करण्यासाठी या देशाच्या आर्थिक विकासास खिळ घालण्यासाठी जलस्त्रोत जाणिवपूर्वक अडवल्याचीही उदाहरणे आहेत. सिरियन यादवी युद्धात सत्ताधाऱ्यांकडून देशातील बंडखोर आणि त्यांनी व्यापलेले प्रदेश यांना नेमक्या वाटाघाटीच्या वेळी जेरीस आणण्यासाठी पाणी पुरवठा खंडीत करण्याचे शस्त्र अनेकदा उगारले गेले आहे.
द पॅसिफिक इन्स्टिट्यूट या संस्थेकडे पाण्याचा युद्धासाठी, संघर्षासाठी, सुडासाठी वापर झालेल्या घटनांची एक मोठी यादीच आहे. त्यातील अगदी अलीकडची म्हणजे 2018 ते 2022 या चार-पाच वर्षातील माहिती पाहिली तर हे निदर्शनास येते की, या काळात मध्यपूर्व आणि उत्तर आफ्रिका या भागात मोठ्या प्रमाणात पाण्याचा शस्त्र म्हणून वापर झाला आहे. त्यानंतर रशिया, युक्रेन आणि सहारा वाळवंट प्रदेशातील काही देशांचा क्रमांक लागतो.
सध्या रशिया-युक्रेन युद्धात चर्चेत असलेल्या नोव्हा कारवोव्हका धरणाच्या बाबतीत दुर्घटना पूर्वनियोजित की अपघाती या संदर्भात बऱ्याच शक्यता वर्तविल्या जात आहेत. लंडन विद्यापीठातील भौतिक भूगोल शास्त्रातील संशोधक प्रा. मुलीगन यांनी दोन शक्यता वर्तविल्या आहेत. त्यातील पहिली म्हणजे सततच्या युद्धामुळे धरणाच्या बांधकामाची झालेली हानी आणि परिणामी धरणफुटी. दुसरी शक्यता ही की, रशिया ज्याचे या धरणावर नियंत्रण होते त्याने जाणिवपूर्वक पाणी पातळी वाढविली. जेणेकरुन धरणाचे पतन निश्चित आणि परिणामकारक होईल.
अमेरिकन विदेशी कृषी सेवा या संस्थेने दिलेल्या उपग्रह छायाचित्रे आणि माहितीनुसार सदर धरणाची पातळी गेल्या काही दिवसात झपाट्याने वाढल्याचे दिसते. त्यामुळे दुसऱ्या शक्यतेस दुजोरा मिळतो आहे. ही एकूण परिस्थिती पाहता आधीच जगापुढे हवामान बदलाचे टांगते संकट असताना पाण्याचा आणि जलस्त्रोतांचा असा विपरीत वापर होणे हे धिक्कारार्ह आहे. अगदी जिनेव्हा तापमानवाढ व हवामान बदल परिषदेने जलस्त्रोतांवरील जाणिवपूर्वक हल्ले हे मानवाधिकाराचे उल्लंघन आणि युद्ध गुन्हेगारी या सदराखाली आणले आहेत. मात्र असे नीतीनियम केवळ बनवून चालणार नाही. त्याच्या अंमलबजावणीसाठी जागतिक समुदायाने त्यामागे भक्कमपणे उभे राहण्याची गरज आहे.
रशिया-युक्रेन युद्धाच्या संदर्भात पाहता अलीकडे जागतिक समुदाय अधिक अलिप्त आणि उदासिन बनत चालला आहे काय, अशी शंका यावी. यामुळे रशिया सारख्या उपद्रवी देशांचे धारिष्ट्या वाढून उद्या त्याने युक्रेन विरोधात रासायनिक, आण्विक किंवा इतर भयंकर शस्त्रास्त्राचा अवलंब केला तर त्याचे दुष्परिणाम दुरगामी आणि माणुसकीस काळिमा फासणारे होतील. त्यापूर्वीच जागतिक समुदायास जाग येईल, ही अपेक्षा.
– अनिल आजगावकर