तानाजी गल्ली-धारवाड रोड येथे काम सुरू : लोखंडी खांबांना पत्रे बसविणार
प्रतिनिधी /बेळगाव
मिरज ते लोंढा दरम्यानच्या रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण करण्यात आल्याने रेल्वेरुळाची जागा वाढली आहे. यामुळे भविष्यात कोणताही अपघात होऊ नये, यासाठी नैर्त्रुत्य रेल्वेने तानाजी गल्ली, रामा मेस्त्री अड्डा, धारवाड रोड या परिसरात लोखंडी संरक्षक कठडा उभारण्याचे काम सुरू केले आहे. लोखंडी खांब बसविण्यात आले असून लवकरच यावर पट्टय़ा व पत्रे बसविण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण त्याचबरोबर विद्युतीकरण करण्यात येत असल्याने रेल्वेची गती अजून वाढणार आहे. तानाजी गल्ली रेल्वेगेटपासून धारवाड रोडपर्यंत घरांना लागून हा रेल्वे ट्रक घालण्यात आला आहे. पूर्वी 1 ट्रक असल्याने जागा कमी व्यापली होती. परंतु सध्या दोन ट्रकमुळे आजूबाजूच्या घरांना लागून ट्रक गेला आहे. भविष्यात कोणताही धोका होऊ नये, या उद्देशाने रेल्वेकडून संरक्षक कठडा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
ट्रकच्या दुसऱया बाजूला पोहोचणे होणार बंद
बऱयाचवेळा लहान मुले रेल्वे ट्रकच्या बाजूला खेळताना दिसून येतात. अनेकांची तर ट्रकवर सायकलवरून स्टंटबाजी सुरू असते. विद्युतीकरणामुळे रेल्वेचा आवाजही कमी होणार असल्यामुळे भविष्यातील धोका ओळखून नैर्त्रुत्य रेल्वेने संरक्षक कठडा उभारण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. यामुळे रेल्वे ट्रकच्या एका बाजूने दुसऱया बाजूला पोहोचणे बंद होणार आहे.