प्रतिनिधी /बेळगाव
देशात हृदयविकाराच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होत आहे. त्यामुळे अभ्यासानुसार 2030 पर्यंत हृदयविकाराने मरणाऱया रुग्णांची संख्या इतर रुग्णांपेक्षा सर्वाधिक असणार आहे. देशातील एकूण मृत्युंपैकी सुमारे 30 टक्के मृत्यू हृदयविकारामुळे होत आहेत. यासाठी जागतिक हृदयदिनाचे महत्त्व पटवून समाजात जागरुकता करणे आवश्यक आहे, अशी माहिती केएलई कार्डिओलॉजी विभागप्रमुख डॉ. सुरेश पट्टेद यांनी गुरुवारी केएलई हॉस्पिटलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यंदा हृदयदिनाची थीम ‘प्रत्येक हृदयासाठी हृदय वापरा’ अशी आहे. प्रत्येकाने हृदयाची काळजी घेऊन त्याला मानसिक, नैतिक आणि भावनिक आधार दिला पाहिजे. मागील 30 वर्षांपासून केएलई हॉस्पिटल हृदयरोग्यांची काळजी घेण्यात राज्यात आघाडीवर आहे. हृदयविकार हा गुंतागुंतीचा विषय असला तरी 8 यशस्वी हृदयप्रत्यारोपण झाले आहे.
अनियंत्रित मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल, शुगर आणि बैठय़ा जीवनशैलीमुळे अलीकडे हृदरविकार रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे, असे कार्डियोलॉजिस्ट सर्जन डॉ. रिचर्ड साल्ढाणा यांनी सांगितले. केएलई हॉस्पिटलमध्ये डॉ. प्रभाकर कोरे यांनी अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध केल्या आहेत. त्यामुळे हृदयप्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया यशस्वी होऊ लागल्या आहेत.
यासाठी न्युरोलॉजिस्ट, न्युरो सर्जन यांचेही सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. एम. व्ही. जाली, डॉ. आर. बी. नेर्ली यांसह न्युरोलॉजिस्ट, न्युरो सर्जन, कार्डियोलॉजिस्ट, इंटेन्सिव्हिस्ट, हृदयप्रत्यारोपण केलेले रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.